– भाजपा, महायुतीच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे वेतन बळीराजासाठी
– भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे प्रतिपादन
मुंबई :- भाजपा – महायुती सरकार हे पूरग्रस्त भागातील शेतक-यांसोबत असून कोणत्याही निकषाविना सर्वतोपरि मदत करण्यासाठी कटीबद्ध आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व आमदार, खासदारांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अतिवृष्टीग्रस्त भाग आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहे. मात्र संजय राऊत, उबाठा गटाचे लोकप्रतिनिधी स्वत:च्या खिशातून एक दमडी शेतक-यांना न देता वायफळ बडबड करत आहेत, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी खा. संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. भाजपा प्रदेश कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यातील अडीच हजार कोटींची मदत 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात आणखी मदत दिली जाणार आहे. राऊत आणि उबाठा यांनी जनता, शेतकरी आणि मुंबईकरांना लुटून स्वत:चे खिसे भरण्याचे पाप केले. राऊत उबाठा गटाची ‘लेना बँक आहे तर भाजपा- महायुतीची देना बँक आहे’, असेही बन म्हणाले.
यावेळी बन म्हणाले की, भाजपा महायुती सरकार शेतक-यांच्या दु:खात सहभागी असून सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहून मदतीचा हात पुढे करत आहे. उलट महाविकास आघाडीचे नेते एकदाही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत, फक्त बसून गप्पा मारत आहेत. राऊत हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत कशी करावी यावर शहाजोगपणे सल्ले देत आहेत. सत्तेत असताना अडीच वर्षांत साडेनऊ लाख कोटी रुपयांची लूट करणाऱ्या उबाठा गटाने आणि राऊतांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. एवढा पैसा खिशात गेला तर किमान 20 हजार कोटी मराठवाड्यातील ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिले पाहिजेत असा बोचरा सल्लाही बन यांनी दिला.
आधी काँग्रेस आमदारांना पूरग्रस्तांसाठी वेतन देण्यास भाग पाडा!
शेतकऱ्यांसाठी महायुतीने तातडीने अडीच हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, याची खात्री सरकारने दिली आहे. मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे आमदार अजूनही निष्क्रीय आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस आमदारांना पूरग्रस्तांसाठी वेतन देण्यास भाग पाडावे असे आव्हान बन यांनी दिले.
रोहित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेत बन म्हणाले की, त्यांनी सरकारला जाब विचारण्याआधी स्वतःचे आजोबा शरद पवार दहा वर्षे कृषिमंत्री होते, तेव्हा शेतक-यांची स्थिती दयनीय होती, सर्वाधिक आत्महत्या त्या काळात झाल्या होत्या. पवारांनी तेव्हा शेतकरी हितासाठी काय काम केले ? रोहित पवार यांना जाब विचारायचा असेल तर तो त्यांनी आधी सिल्वर ओकवर जाऊन आजोबांना विचारावा.
उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांचे दु:ख तीन तासांत कसे कळणार ?
उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यातील 3 तासांच्या धावत्या दौ-यावर टीका करत बन म्हणाले की, हा दौरा म्हणजे केवळ देखावा, नौटंकी आहे. सकाळी मातोश्रीवर नाश्ता करून बाहेर पडणे आणि दुपारी अडीच वाजता जेवणासाठी परत जाणे, अशा धावत्या दौ-यातून शेतकऱ्यांचं दुःख समजून घेता येते का, असा सवाल शेतकरीच करत असल्याचेही बन म्हणाले. मागेही मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी रेड कार्पेट टाकून ओल्या दुष्काळाची पाहणी केली होती याची आठवण पुन्हा एकदा करून देत ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आयुष्यातील चिखल आणि पाणी यांना स्पर्श न करता फक्त रेड कार्पेटवर उभं राहून संवेदनशीलतेचा दिखावा करणे, हा शेतकऱ्यांचा अपमान आहे.




