यवतमाळ :- पर्यावरण वाचवण्यासाठी आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पाऊसाचं पाणी अडवणं आणि जमिनीत मुरवण ,हेच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे. दिवसेंदिवस भूगर्भातील पाणी पातळी खाली खाली जात आहे. पावसाचं वाहून जाणारं पाणी अडवून भूगर्भात मुरवणं आणि वाहून जाणारी माती थांबवणं ही काळाची गरज आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने आणि शासनाने एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे, असं आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे.
महाराष्ट्र शासनाने जलसंधारणासाठी स्वतंत्र “मृद व जलसंधारण विभाग” निर्माण केला आहे. गेल्या काही वर्षांपासून या विभागामार्फत राज्यभर भरीव काम सुरू आहे. सध्या या विभागाची धुरा माझ्याकडे आहे. आम्ही “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती मंत्री राठोड यांनी दिली.
मंत्री ना. राठोड म्हणाले, “आपल्या तलावांमध्ये, बंधाऱ्यांमध्ये, धरणांमध्ये गेल्या कांही वर्षांपासून भरपूर गाळ साचला आहे. हा गाळ म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोनं आहे. हा नैसर्गिक कंपोस्ट खत आहे. जर आपण धरणातील हा गाळ काढून शेतात टाकला, तर दोन फायदे होतात. धरणातील गाळ निघाल्यामुळे धरणात अधिक पाणी साठतं आणि ते अधिक दिवस टिकतं.
तर हा गाळ शेतात टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढते, उत्पादन वाढतं आणि शेतकरी सुखी होतो.”
सगळ्यांनी सहभाग घ्यावा
मंत्री राठोड यांनी पुढे सांगितले की, “छोटे-छोटे बंधारे बांधणं, नाल्यांचं खोलीकरण-रुंदीकरण करणं, पावसाचं पाणी अडवणं ही कामं आज राज्यभर सुरू आहेत. पण हे काम फक्त शासनाचं नाही, समाजाचंही आहे. प्रत्येक गावाने, प्रत्येक शेतकऱ्याने या मोहिमेत सहभाग घ्यावा. आपण जर आज पाणी अडवलं, माती अडवली, तर उद्याची पिढी आपल्याला धन्यवाद देईल.”
“पर्यावरण वाचवायचं असेल, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणायचा असेल, तर जलसंधारणाशिवाय पर्याय नाही.”, असे संजय राठोड यांनी शेवटी म्हटले आहे.







