गडचिरोली :- शासनाने दिनांक 02 जुन ,2026 व 15 जुलै 2026 रोजीच्या संदर्भिय शासन निर्णयान्वये “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६” ही योजना जाहिर केलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांकडील दि. 01.04.2019 ते दि. 31.03.2025 पर्यंत उचल केलेल्या पिक कर्जाची दि.30.09.2025 अखेर थकीत असलेली व दि. 31.03.2026 अखेर परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यात रु.2.00 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल.
सन २०२३-२४ अथवा सन २०२४-२५ या वर्षात घेतलेल्या व त्याची विहीत कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची प्रति शेतकरी रु. ५० हजार इतक्या अधिकतम रकमेपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल.
राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून दिनांक 24.07.2026 रोजी प्राप्त झालेल्या असुन सदर यादया दिनांक 25 व 26 जुलै 2026 रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, जि.म.स. बँक, राष्ट्रीयकृत बँक,ग्रामीण व व्यापारी बँकेच्या शाखेत, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तसेच गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 6423 शेतकरी पात्र ठरले असून त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. व तसा संदेश कर्जदार शेतक-यांच्या मोबाईलवर वितरीत झालेला आहे.
या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याचे बायोमेट्रिक अथवा आधार प्रमाणीकरण करून घेणे अनिवार्य आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता आवश्यक कार्यवाही करावी. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये 31 जुलै,2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
सदर योजनेतंर्गत शासनाने बँकेला सुचविलेल्या हेअरकट नुसार थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ देतांना सर्व बँकानी शेतक-यांचा कर्ज खात्याचा एनपीए च्या कालावधीनुसार कर्जाला हेअरकट च्या सुत्रानुसार देण्याचे निश्चित केलेले आहे. त्यामुळे थकबाकी असलेले शेतकऱ्यांचे कर्जखाते रक्कम प्रमाणनुसार कमी जमा होईल. त्यामुळे उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांना बँके खात्यात जमा करण्याची आवश्यकता नाही. तसेच बँका सुध्दा मागणी करणार नाही.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६, या योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे बँक स्तरावर इ-केवायसी प्रमाणीकरण न झालेल्या 3852 कर्ज खात्यांची यादी ग्रामपंचायत, सहायक निबंधक व बँकेच्या कार्यालयात प्रसिध्द केली आहे. या यादीत नांव असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केद्रांत जाऊन इ-केवायसी करुन घ्यावी. जेणेकरुन आपण सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठराल. गडचिरोली जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना लाभ तातडीने मिळण्याकरीता आपले सरकार केंद्रावर सर्व शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन मा. जिल्हाधिकारी,गडचिरोली यांनी केलेले आहे.





