हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्रावर सुमारे ११ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा असताना, सरकार केवळ आश्वासनांचा पाऊस पाडत असून प्रत्यक्षात शेतकरी मात्र वाऱ्यावर आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रीय किसान मोर्चाचे अभय रंगारी यांनी केली आहे.
रंगारी यांनी म्हटले की, राज्याची महसुली तूट आणि वाढता खर्च यामुळे गरिबांवर आर्थिक बोजा वाढत आहे. कर्जमाफीच्या जाचक अटींमुळे अल्पभूधारक शेतकरी योजनेपासून वंचित आहेत. शेतीमालाला हमीभाव नाही, सिंचन प्रकल्पांना पुरेसा निधी नाही आणि बियाणे-खतांचे दर गगनाला भिडले आहेत. नैसर्गिक आपत्तीवेळी मिळणारी मदतही अत्यंत तोकडी आहे.
शेतमालाच्या साठवणुकीसाठी सरकारने ‘घरकुल’ योजनेच्या धर्तीवर ‘गोदाम योजना’ सुरू करणे आवश्यक होते. कोल्ड स्टोरेज आणि प्रक्रिया उद्योगांच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकंदरीत हा अर्थसंकल्प म्हणजे “छत हिरावून घेऊन कंबल दान करण्यासारखा” असून तो शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे,
– अभय डी रंगारी
राष्ट्रीय किसान मोर्चा भंडारा