सचिन चौरसिया,रामटेक :- आषाढी एकादशीचे पायी वारी पालखी सोहळ्याचे औचित्य साधून शितलवाडी रामटेक येथील स्नेह सदन बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी एक विलोभनीय दिंडी सोहळा काढून. विठू नामाच्या गजराने आणि टाळ-मृदुंगाच्या नादाने संपूर्ण शितलवाडी परिसर भक्तिमय झाला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि भक्तिभाव रुजावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या भक्तीमय प्रसंगी माऊलीच्या जयघोषाने आणि ज्ञानबा-तुकाराम च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दिंडी सोहळ्यासाठी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांची पारंपरिक वारकरी पोशाख परिधान केला होता. यावेळी मुलांनी धोतर, कुर्ता, टोपी आणि कपाळावर बुक्का लावून विठ्ठल रूपी नटली होती, तर मुलींनी नऊवारी लुगड नेसून, हातात टाळ, मृदंग आणि डोक्यावर तुळशी वृंदावन व कलश घेऊन उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. शाळेच्या प्रांगणातून विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. कांद्री माईनचे प्रतिनिधी प्रवीण नागपुरे, आकांशा शाहू, डेनियल भट्टी व विक्की चौरे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. शाळेचे मुख्याध्यापक पंकज पांडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.





