spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोर्शी तालुक्यातील बँकांचा संत्रा फळ पीक विमा घेण्यास नकार !  

– शेतकरी विरोधी कृत्य करणाऱ्या बँकांवर कार्यवाही करण्याची मागणी ! 

– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आंदोलनाचा ईशारा ! 

मोर्शी :- मोर्शी तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेसह विविध बँका संत्रा पिकाचा फळ पिक विमा काढण्यास नकार देत असल्यामुळे तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकरी हवामानावर आधारित फळ पिक विमा व गारपिट विमा योजनेपासून वंचित राहत आल्यामुळे शेतकऱ्यांचा विमा न काढणाऱ्या शेतकरी विरोधी बँकांवर कार्यवाही करून बँकांना फळ पिक विमा काढण्याचे निर्देश देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

मोर्शी तालुक्यामध्ये २५ हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी संत्रा फळ पिक घेतले जात असून हजारो हेक्टर क्षेत्राचा फळ पिक विमा तालुक्यातील शेतकरी काढतात. मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी संत्रा पिकांना संरक्षण कवच म्हणून फळ पिक विमा भरण्यास सुरुवात केली असून हवामानावर आधारित गारपिट विमा हा फक्त बँकेमधूनच काढता येतो तो बाहेर सीएससी केंद्रांवर काढता येत नसल्यामुळे फळ पिक विमा व गारपीट विमा भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. मात्र मोर्शी तालुक्यातील बँकानी शासन आदेशाला केराची टोपली दाखवत संत्रा पिकाचा फळ पीक विमा घेण्यास शेतकऱ्यांना नकार दिल्याने मोर्शी तालुक्यातील २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहे.

मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी तालुक्यातील बँक उघडल्यानतंर पीक विमा भरून घेण्यासाठी बँकेत गेले असता त्या ठिकाणी बँकेतील कर्मचाऱ्यांनी पीक विमा भरल्या जाणार नाही असे म्हणून धुडकावून लावतात त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची निराशा होत असून बँकांप्रती रोष निर्माण होत आहे.

३१ नोव्हेंबर ही फळ पीक विमा भरण्याची अंतिम तारीख असल्यामुळे शेतकऱ्यांजवळ फक्त ५ दिवस शिल्लक असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बँका समोर गर्दी करुन विमा भरुन घेण्यास विनंती करीत आहे तरीसुद्धा मोर्शी येथील भारतीय स्टेट बँक व तालुक्यातील इतर सर्व बँका फळ पिक विमा काढण्यास नकार देत आल्यामुळे शेतकरी विरोधी कृत्य करणाऱ्या बँकांवर कार्यवाही करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना फळ पिक विमा गारपिट विम्यापासून वंचित ठेवणाऱ्या बँकांवरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी शासनाला दिला आहे.

शेतकऱ्यांच्या भरवश्यावर चालणाऱ्या बँकांची शेतकरी विरोधी भूमिका ! 

बँकानी शेतकऱ्यांचा फळ पिक विमा भरुन घ्यावा असे आदेश शासनाने दिले. शेतकऱ्यांनी शासन निर्णयाचे स्वागत केले. मात्र बँकानी शासन आदेशाला न जुमानता फळ पिक विमा भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना धुडकावुन लावले आहे. बरेच शेतकरी शेतातील हातातील काम सोडुन उसनवारी करीत पिक विमा भरण्यासाठी तालुक्यातील एसबीआय बँकेसह इतर बँकांमध्ये विमा भरण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी पीक विमा घेण्यास शेतकऱ्यांना नकार देण्यात आला. ज्या ठिकाणी बँका शासनाचा आदेश मानत नाहीत व शेतकऱ्यांना फळ पिक विमा योजनेपासून वंचित ठेवण्यासाठी मागे पुढे पहात नाही अशा बँकांवर कार्यवाही करण्यासाठी कोणताही अधिकारी पुढाकार घेत नाही हि शोकांतिका आहे

– रुपेश वाळके अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.