पांढरकवडा :- नागपूर हैदरावाद राष्ट्रीय महामार्गावर पांढरकवडा पोलिसांनी कारवाई करत १७ गोवंशीय जनावरांची सुटका केली. अत्यंत क्रूरपणे कोंबून नेल्या जात असलेल्या या जनावरापैकी १४ बैल जिवंत आढळले,तर ३ बैलांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून १७ लाख ५९ हजार रुपयांचा मुदेमाल जप्त केला आहे. १० मार्च रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कोंघारा फाट्यावर पोलिसांनी सापळा रचला होता. नागपूरकडून हैदराबादकडे जाणारे आयचर वाहन (क्र. एम.एच ४०
सी.एम ३२३०) अडवून तपासणी केली असता, त्यात पाय व मान घट्ट बांधलेल्या अवस्थेत जनावरे आढळली. मृत ३ बैलांचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले, तर जिवंत १४ बैलांना पांढरकवडा नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात सुरक्षित हलवण्यात आले आहे. मुद्देमाल आणि अटक केलेले आरोपी: पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीचे वाहन आणि २.५९ लाखांची जनावरे जप्त केली आहेत. आरोपींमध्ये मोहम्मद रिजवान रफिक शेख, अब्दुल रफिक अब्दुल कदिर कुरेशी, सड़ू उर्फ सद्दाम कुरेशी (तिघेही रा. नागपूर), मोहम्मद जुनेद अब्दुल कादिर (वणी) आणि निखील डोरले (भंडारा) यांचा समावेश आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लहुजी तावरे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन रघुपती, पोलीस हवालदार राम राठोड, विलास जाधव, रजनीकांत पाटील आणि नापोकाॅ सुनिल राठोड यांच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे महामार्गावरील तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.