गडचिरोली, दि.24 (जिमाका): छत्तीसगड राज्यातील अबुजमाड परिसरात २७ माओवाद्यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर माओवादी संघटनांनी ११ जून ते ३ ऑगस्ट दरम्यान स्मारक सभा व आंदोलनांचे आवाहन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात 25 जुलै रोजी मध्यरात्रीपासून 08 ऑगस्ट रात्रीपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अंतर्गत शस्त्रे, दगड, स्फोटके, भडकाऊ साहित्य बाळगणे, घोषणा करणे, सभा घेणे, पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, मिरवणुका काढणे यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणतीही आंदोलनात्मक कृती करण्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. सदर जमावबंदी आदेश गडचिरोली जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.




