कामठी २५ :- कामठी रेल्वे सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी रेल्वे स्थानकाच्या सभागृहात पार पडली. बैठकीत प्रवाशांच्या मूलभूत गरजा, वाढता प्रवासी ताण व रेल्वे स्थानकाच्या विकासाबाबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत समिती सदस्यांनी एकमुखाने केलेल्या मागण्यांमध्ये रेल्वे स्थानकावरील ओव्हर ब्रिज एंड टू एंड उतरवावा, जेणेकरून दोन्ही बाजूंनी ये-जा सोयीस्कर होईल.ज्येष्ठ नागरिक, अपंग व आजारी प्रवाशांसाठी बॅटरी कारची सुविधा देणे गरजेचे आहे.
गोंडवाना, गीतांजलि व बिलासपूर एनोकुलम् एक्सप्रेसला कामठी स्थानकावर थांबा देण्यात यावा, जेणेकरून दीर्घ पल्ल्याचे प्रवासी सोयीस्करपणे प्रवास करू शकतील.कामठी रेल्वे स्थानकाला शहीद भगतसिंग यांचे नाव देऊन त्यांचा बलिदानाचा इतिहास कायम स्मरणात रहावा.अमृत भारत योजना अंतर्गत सुरू असलेली विकासकामे गतीमान करून पूर्ण करण्यात यावीत.
लिफ्ट व एस्केलेटरची कामे तातडीने पूर्ण करावीत.
प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर कोच इंडिकेटर बसवावा, जेणेकरून प्रवाशांना गाड्यांबाबत अचूक माहिती मिळेल.समितीचे प्रमुख सदस्यांनी सांगितले की, कामठी हे नागपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून दररोज हजारो प्रवासी येथे प्रवास करतात. त्यामुळे सुविधा ही केवळ सोयीपुरत्या नसून स्थानिक नागरिकांच्या हक्काची बाब आहे.
बैठकीत उपस्थित असलेल्या सदस्यांनी सांगितले की, लिफ्ट व एस्केलेटर नसल्याने वृद्धांना त्रास होतो. प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे. त्यांनी सांगितले, “एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाल्यास शैक्षणिक व रोजगाराच्या संधी वाढतील.सर्व सदस्यांनी ठामपणे रेल्वे प्रशासनाकडे जनतेच्या अपेक्षा पोहोचवून त्यावर लवकर कार्यवाही करण्याचे आवाहन केले.बैठकीत रेल्वे स्टेशन प्रबंधक सुरेश पाल, रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य सर्वश्री मोहनलाल शर्मा, जयप्रकाश तिवारी, राजेश खंडेलवाल, प्रेमनारायण शर्मा, सुनील खानवानी, पंकज वर्मा प्रामुख्याने उपस्थित होते




