– शिक्षकांचे रिक्त पद भरा अन्यथा गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण: सामाजिक कार्यकर्ते राहुल बावणे
किशोर साहू, मौदा :- निसतखेडा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत सुसज्ज झाली आहे. शाळेच्या व शाळेच्या आवाराच्या भिंतीही बोलक्या झाल्या आहेत. मागच्या वर्षी या शाळेची पटसंख्या 48 होती. मागच्या वर्षी दोन शिक्षकी असलेली ही जिल्हा परिषद शाळा एक शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या शिक्षकाची अजूनपर्यंत नियुक्ती न झाल्याने शिक्षकांच्या कमतरतेमुळे या शाळेची पटसंख्या 48 वरून यंदा 36 वर आलेली आहे.
निसतखेडा येथील ग्रामस्थांनी आपली मुले याच शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतलेला होता. परंतु शिक्षकांची संख्या कमी असल्याने याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होऊ लागला आहे. यामुळे गावातील पालकांच्या मनात शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत प्रचंड मोठी नाराजी असून त्यांनी आपल्या मुलांचे प्रवेशाचे दाखले निसतखेडा गावातील प्राथमिक शाळेतून काढून बाहेर गावाच्या खासगी शाळेत प्रवेश दाखल केलेले आहेत. शिक्षकांच्या कमतरतेमुळे निसतखेडा गावातील पालकांना शिक्षणाची चिंता भेडसावत आहे. ही बाव प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत चिंताजनक असून गोरगरीब शेतकरी व शेतमजूर जनतेच्या मुलांना चांगल्या दर्जाच्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप प्रशासन करीत आहे. असे सामाजिक कार्यकर्ते राहुल बावणे यांनी व्यक्त केले.
निसतखेडा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकूण 5 वर्ग असून शिक्षक फक्त 1 आहेत. त्यामुळे 2 शिक्षकांची अत्यंत आवश्यकता आहे. जर शिक्षकांची संख्या तालुक्यात कमी असेल तर कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची भरती करून नियुक्ती करावी. अशी मागणी होत आहे .राहूल ज्ञा. बावने यांनी गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना दहा दिवसात शिक्षक उपलब्ध करावा, अशी मागणी केली. दहा दिवसात शिक्षक न मिळाल्यास आपल्या कार्यालयासमोर पालकांना घेऊन उपोषण करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राहुल बावणे दिला आहे.




