– अतिवृष्टी मदत व सवलती आता सर्व तालुक्यांना लागू, शासन आपदग्रस्तांच्या खंबीरपणे पाठिशी – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ :- अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुक्यांसाठी शासनाकडून विशेष मदत पॅकेज घोषित करण्यात आले. त्यात जिल्ह्यातील दिग्रस, पुसद, उमरखेड व महागाव या चार तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील अतिवृष्टीचा विचार करून सर्व तालुके आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आले असून, सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
याबाबत सुधारणांनुसार शासन निर्णय आज निर्गमित झाला. यापूर्वीच्या शासन निर्णयाद्वारे बाधित तालुके म्हणून जिल्ह्यातील वणी, झरी जामणी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, दारव्हा, नेर, बाभूळगाव या तालुक्यांना घोषित करण्यात आले. तथापि, १५ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुर परिस्थितीने झालेले शेतीपिकांचे नुकसान, पशुहानी, नागरिकांचे स्थलांतरण व घरांचे नुकसान ही परिस्थिती पालकमंत्री श्री. राठोड यांनी लेखी निवेदनाद्वारे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. विभागाच्या प्रधान सचिवांनाही पत्र देऊन पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे सुधारित शासन निर्णयानुसार दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांना आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यातील सर्व बाधितांना दुष्काळसदृश्य परिस्थितीत लागू असणा-या सर्व सवलती देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती (एक वर्षासाठी), तिमाही वीज देयकात माफी व परीक्षा शुल्कात माफी आणि 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांची फी माफी आदी सवलती या सर्व तालुक्यांत लागू होतील.
शासन आपद्ग्रस्त बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे. नव्या शासन निर्णयानुसार सर्व बाधितांना लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.




