हंसराज,भंडारा :- जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालय आज भंडारा जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांच्या विविध मागण्या संदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. आमदार नाना पटोले, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारी व मागण्यांवर विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. कोणतीही समस्या प्रलंबित ठेवू नये तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले. कर्जमुक्तीचा लाभ देण्याची मागणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. फार्मर आयडी, ॲग्रीस्टॅक तसेच आधार प्रमाणीकरणाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा किमान १६ तास वीज उपलब्ध करून द्यावी, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी तसेच सौर कृषी पंपधारकांना गरजेनुसार नवीन मीटर बसविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.
मनरेगा मजुरीसह पाणीपुरवठ्याचे प्रश्न प्रलंबित मनरेगा कामांची देयके तसेच मजुरांची थकीत मजुरी तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली. ‘हर घर नल, हर घर जल’ आणि जलजीवन मिशनअंतर्गत बंद अथवा अपूर्ण असलेली कामे पूर्ण करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
भूमीगत गटार व पाणीपुरवठा योजनांसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करावी, असेही निर्देश देण्यात आले.
घरकुलांचे हप्ते, शिक्षक भरतीचा प्रश्न ऐरणीवर
प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते तातडीने वितरित करून रखडलेली घरकुलांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.





