– माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांची दूरदृष्टी !
अमरावती प्रतिनिधी :- माजी कृषी मंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे ड्राय झोन असलेल्या मोर्शी तालुक्यातील घोडदेव सिंचन प्रकल्पामुळे परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून हा प्रकल्प आज हजारो हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाचा आधार बनला आहे. घोडदेव, दापोरी, डोंगर यावली, हिवरखेड तसेच परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला या प्रकल्पामुळे बारमाही पाण्याची उपलब्धता निर्माण झाली आहे. परिणामी संत्रा उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळाली आहे.
मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलणारा घोडदेव सिंचन प्रकल्प आज हजारो शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरत आहे. दूरदृष्टी, प्रभावी नियोजन आणि शेतकरी हिताला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प साकार झाला असून त्याचा लाभ आज घोडदेव, डोंगर यावली, हिवरखेड, दापोरी, सालबर्डी तसेच परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना होत आहे.

पूर्वी या भागातील शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून होती. पावसाच्या अनिश्चिततेमुळे संत्रा बागांची वाढ, उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम होत होते. अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. मात्र घोडदेव सिंचन प्रकल्पामुळे सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आणि परिसरातील शेतीला नवसंजीवनी मिळाली.
या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असून मोर्शी तालुक्यात संत्रा लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नियमित पाणीपुरवठ्यामुळे संत्रा बागांची उत्पादकता वाढली, फळांची गुणवत्ता सुधारली आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून बागायती शेतीकडे वाटचाल केली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात विकासकामे उभी करण्याची क्षमता हर्षवर्धनजी देशमुख यांनी दाखवून दिली आहे. घोडदेव सिंचन प्रकल्प हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताच्या बांधिलकीचे जिवंत उदाहरण मानले जात आहे. या प्रकल्पामुळे केवळ पाण्याची उपलब्धता वाढली नाही, तर हजारो कुटुंबांच्या जीवनमानातही सकारात्मक बदल घडून आला आहे.
आज घोडदेव सिंचन प्रकल्पाकडे पाहताना परिसरातील शेतकरी कृतज्ञतेने सांगतात की, “पाणी आले, हरितक्रांती आली आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.” मोर्शी तालुक्यातील कृषी विकासाचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून भविष्यातही या प्रकल्पाचा लाभ अनेक पिढ्यांना मिळत राहणार आहे.
“दूरदृष्टी असलेले नेतृत्व, शाश्वत सिंचन व्यवस्था आणि समृद्ध शेतकरी हेच घोडदेव सिंचन प्रकल्पाचे खरे यश आहे.
“घोडदेव सिंचन प्रकल्पामुळे आमच्या भागातील शेतीला नवे जीवन मिळाले आहे. पूर्वी पावसाच्या भरोशावर शेती करावी लागत होती. पाण्याअभावी संत्रा बागा टिकवणे कठीण होत होते. मात्र आज सिंचनासाठी नियमित पाणी उपलब्ध झाल्याने संत्रा उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. हा प्रकल्प माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे.
– रुपेश प्रकाशराव वाळके अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष, मोर्शी तालुका







