– बुद्ध धम्म सेवक संघ व डिगडोह जागृती मंचचे आयोजन
नागपूर :- सत्ता योग्य हातात दिली तरच ग्रामविकास शक्य आहे, असा प्रभावी संदेश देत राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी समाजातील सर्व घटकांना जागरूकतेचा आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा संदेश दिला. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने आयोजित या समाजप्रबोधनपर कीर्तनात नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
सीतानगर बस स्टॉप, एस.आर.पी.एफ. कॅम्पच्या बाजूला, हिंगणा रोड, नागपूर येथे हे कीर्तन पार पडले. या कार्यक्रमाचे आयोजन बुद्ध धम्म सेवक संघ, नागपूर आणि डिगडोह जागृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक जितेंद्र ताराचंद मेश्राम व संगीता मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून भंते डॉ. शिलवंश महाथेरो, ज्येष्ठ संपादक प्रमोद काळबांडे, डी.आय.सी.सी.आय.चे अध्यक्ष गोपाल वासनिक, डी.आय.सी.सी.आय. विदर्भ चॅप्टरचे माजी अध्यक्ष विजय सोमकुंवर, डी.आय.सी.सी.आय. विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष राजरत्न मेंढे, मीडिया हेड विनोद मेश्राम, तसेच गुरुदेव युवा मंचचे ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते.

या प्रसंगी समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी आपल्या प्रबोधनातून समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या बौद्ध तत्त्वांचा अर्थ आणि त्यांचे आजच्या काळातील महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, समाजाचे आणि राष्ट्राचे खरे पुनरुत्थान तेव्हाच शक्य आहे जेव्हा सत्ता प्रामाणिक, संवेदनशील आणि लोकाभिमुख हातात दिली जाते. अन्यथा विकासाचे स्वप्न केवळ घोषणा बनून राहते.
तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि बुद्ध वंदनेने झाली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार आयोजक जितेंद्र मेश्राम आणि संगीता मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आला. डिगडोह जागृती मंच, बुद्ध धम्म सेवक संघ, समता सैनिक दल यांच्यासह विविध संघटनांच्या वतीने सत्यपाल महाराजांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाबद्दल नागपूर शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण होते. समाजातील विविध घटक, युवा वर्ग, महिला, तसेच बौद्ध समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. आभार सतीश कन्हेरकर यांनी मानले. कार्यक्रमाला बंडू शंभरकर, राजेंद्र तुरकाने, ॲड. महेंद्र देठे, सुभाष चोरपगार, होमदास पाटील, हरिभाऊ ढोले, बाबाराव धंदर, पिंपळदास लोखंडे, उत्तम पाटील, सूर्यकांत गजभिये, प्रभाकर थूल, अशोक जामगडे, रूपेश लोखंडे, जितेंद्र मेश्राम,तायवाडे, नितेश कांबळे, गौतम नितनवरे, प्रतीक म्हैसकर, भीमराव बिसाद्रे आणि श्री. दामले आदींचे सहकार्य लाभले.




