– कन्हान शहर विकास मंच व्दारे शहीद चौकात श्रद्धांजली व वीर जवानांच्या शौर्यास अभिवादन
कन्हान :- कारगिल विजय दिनानिमित्त कन्हान शहर विकास मंचच्या व्दारे तारसा रोड येथील शहीद प्रकाश देशमुख चौकात भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाचे स्मरण करून त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मंचाचे नवनिर्वाचित सदस्य शुभम केवट यांच्या हस्ते वीर शहीद प्रकाश देशमुख यांच्या प्रतिमेस व शहीद स्मारकास पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळुन शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मार्गदर्शक भरत सावळे यांनी कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांनी दाखविलेल्या अद्वितीय शौर्य, धैर्य आणि राष्ट्र निष्ठेचा गौरव केला. शहीदांच्या बलिदानामुळेच देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राहिली असुन त्यांच्या त्यागातुन प्रत्येक नागरिकाने देशभक्ती ची प्रेरणा घेऊन राष्ट्रसेवेची भावना जपली पाहिजे, असे मत भरत सावळे यांनी व्यक्त केले. शहीदांचे बलिदान हे देशवासीयांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “शहीद जवान अमर रहे” या देशभक्तीपर घोषणांनी संपुर्ण परिसर भारावुन गेला आणि उपस्थितांनी वीर जवानांना कृतज्ञपुर्वक अभिवादन केले. कार्यक्रमास कन्हान शहर विकास मंचा संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिये, सूर्यभान चकोले, प्रमोद गिऱ्हे, शुभम बावनकर, मीना गिऱ्हे, सुनिता मानकर, अर्चना तांडेकर, आयुष संतापे, अर्जुन पात्रे, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे, शुभम केवट, मयुर बावने, हर्षल मेश्राम, नमन रामटेके यांच्या सह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





