कामठी :- कामठीतील एका विवाहित महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा करत तिचाच पती हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न केले आहे. गुरुवारी 25 जून ला न्यालायायीन निकालात घटस्फोटानंतर च्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी पत्नीची हत्या करून आरोपीने सूड उगवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मृत महिला मंजू संदीप पचारे (वय २७) रा वारीसपुरा कामठी हिचा विवाह २०२३ मध्ये संदीप राजूजी पचारे रा पाचखेळ तालुका पुलगाव जिल्हा वर्धा याच्यासोबत झाला होता. मात्र पतीच्या दारूच्या व्यसनामुळे आणि सततच्या मानसिक व शारीरिक छळामुळे दोघांमध्ये वाद वाढले. त्यामुळे मंजू गेल्या दीड वर्षांपासून कामठीतील तिच्या आईकडे राहत होती.
दरम्यान, दोघांचा घटस्फोट मंजूर झाल्यानंतर आरोपीने सूडाची भावना मनात ठेवली. पोलिसांच्या माहितीनुसार, न्यायालयातून बाहेर पडल्यावर त्याने मंजूला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आरोपीने कामठीत येऊन तिच्या हालचालींवर लक्ष ठेवले.
शुक्रवारी सायंकाळी संधी साधताच वारीसपुरा च्या गल्लीत धारदार शस्त्राने तिच्यावर सपासप वार केले. छाती, गळा, मान आणि पोटावर गंभीर वार झाल्याने मंजूचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास, चौकशी आणि पुराव्यांच्या आधारे मृत महिलेचा पती संदीप पचारे याला काल वर्धा जिल्ह्यातून अटक केली असून आज न्यायालयात हजर करणार आहेत. पुढील तपास सुरू आहे.तर आरोपी पती संदीप पचारे यावर पूर्वीचे जुगार, हत्येचा प्रयत्न असे तीन प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.,




