किशोर साहू,मौदा, ता. २५:- ग्रामपंचायत नेरला येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करताना, नळ फिटिंग न करता रकमेची उचल करून सरपंचा यांनी अनियमितता केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य कुणाल खोब्रागडे, ग्रामस्थ रितेश देशमुख, अतुल भिवगडे यांनी गट विकास अधिकारी मौदा व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे केली आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी लेखी निवेदनातून केली आहे.
याबाबत मंगळवार( दि. 23 सप्टेंबर )ला सायंकाळ दरम्यान भ्रमणध्वनी वरून सरपंचा नागेश्वरी कडू यांना विचारपूस केली असता ,त्यांनी सांगितले की ग्रामपंचायत अंतर्गत दोन सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम झाले असून शाळेजवळील सार्वजनिक शौचालयात नळ फिटिंग झालेली आहे तर सध्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचे काम सुरू असून , ज्या सार्वजनिक शौचालय बांधकामाची तक्रार झाली आहे त्या शौचालय बांधकामाजवळ नळ योजनेची पाईपलाईन सुरू होताच , जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचे काम पूर्ण होताच तेथे नळ फिटिंग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर भ्रमणध्वनी वरून सचिव बावणे यांनी सांगितले की,मोजमाप पुस्तकात अभियंताने केलेल्या नोंदीनुसार सार्वजनिक शौचालय बांधकामाचे बिल काढलेले आहेत.




