चंद्रपूर ८ : चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील आदिवासी आश्रम शाळेत 8 व 9 ऑगस्ट 2025 रोजी शिळेअन्न खाल्ल्याने 267 मुला-मुलींना विषबाधा झाली. प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्याने पालक व सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वतः पुढाकार घेऊन विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात भरती केले. परंतु आश्रम शाळेतील कर्मचारी, मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका यांनी या घटनेची हवी तेवढी दखल घेतली नाही. स्थानिक बसपा नेत्यांनी व विविध आदिवासी समाजातील कार्यकर्ते व संघटनांनी पुढाकार घेऊन वृत्तपत्राद्वारे वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता.
संबंधित घटनेला एक महिना होत असूनही अजूनपर्यंत दोषींवर काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संबंधितांवर कार्यवाही करावी यासाठी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश चे मिडीया प्रभारी उत्तम शेवडे, चंद्रपूर जिल्ह्या बसपाचे प्रभारी प्रा रामराव ननावरे, पहांदीपारी कृपाललिंगो आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊ टेकाम, गोंडवाना संग्राम परिषदे चे डॉ निरंजन मसराम, राजकुमार मसराम, प्रेरणादायी विरांगणा मुक्ताई आदिवासी चारिटेबल ट्रस्टचे पुरुषोत्तम रंधवे, आदिवासी कृती समितीचे रोहित इलपाची, नागपूर जिल्हा बसपाचे एड वीरेश वरखडे, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, सचिव अभिलेश वाहने, निखिल बोंबर्डे यांच्या शिष्टमंडळाने नागपूर विभागाच्या आदिवासी अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांची नुकतीच भेट घेऊन आश्रम शाळेतील अनेक गैरसोइवर चर्चा करून संबंधितावर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आठ दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विशेषता आश्रम शाळेत दिले जाणारे भोजन हे नेहमीच निकृष्ट दर्जाचे असते, त्यात सुधार केल्या जावा यावर अनेक विद्यार्थी व पालकांनी मत व्यक्त केले. यावर आयुषी सिंह मॅडम यांनी आठ दिवसात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.




