नागपूर प्रतिनिधी ता 3: कपिलनगर पोलिसांनी वाहन चोरीच्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे नागपुरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.
२९ ऑगस्ट, २०२५ रोजी रात्री ११:३० ते ३० ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ९:३० च्या दरम्यान, ऋतिक हिरामन बामबरडे (वय २५, रा. मानवनगर, नारी रोड, कपिलनगर, नागपूर) यांच्या घरासमोरून त्यांची २०,००० रुपये किमतीची हिरो मोटरसायकल (एमएच ४९ बीएम ४६७८) चोरीला गेली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध
या गुन्ह्याचा तपास करत असताना, कपिलनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तांत्रिक माहितीचा वापर करून आणि खात्रीशीर माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची नावे १) निशांत सुकेश पाली (वय २४, रा. एनआयटी क्वार्टर जवळ, कपिलनगर) आणि २) उस्मान उर्फ इरफान अकबर खान (वय २१, रा. भंते आनंद कौसल्या नगर, पिवळी नदी, कामठी रोड) अशी आहेत.
अधिक चौकशीत आणखी एका गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी बामबरडे यांची मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. तसेच, त्यांनी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २५,००० रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची अॅक्टिवा गाडी (एमएच ३१ सीएक्स १२७४) देखील चोरल्याचे कबूल केले. आरोपींकडून एकूण ४५,००० रुपये किमतीची दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सतीश आडे, महिला पोलीस उपनिरीक्षक शिवाली उलमाले, पोलीस उपनिरीक्षक योगेश नाल्टे, पोलीस हवालदार शहजाद शेख, मनोज बहुरूपी, संजू भूषणम, निलेश पवार, रितेश वर्मा, गणेश शाहूसाकडे, मुकेश हलमारे आणि देवेन काळे यांनी केली.




