नागपूर :- ‘लेखिका रश्मी पदवाड मदनकर लिखित व पद्मगंधा प्रकाशन प्रकाशित ‘कायांतर’ या तृतीयपंथी समाजाच्या वास्तवावर आधारित चरित्रात्मक कादंबरीचा ग्रंथपरिचय व एकपात्री नाट्यप्रयोगाचा विशेष कार्यक्रम बुधवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंटिफिक सभागृह, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर येथे सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून विजयालक्ष्मी बिदरी (विभागीय आयुक्त, नागपूर) उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी आ. संदीप जोशी (सदस्य, विधान परिषद महाराष्ट्र) विराजमान राहतील. तसेच मुख्य वक्ते विचारवंत आशुतोष अडोनी आणि भाष्यकार ज्येष्ठ लेखिका मनिषा अतुल असणार आहेत.
‘कायांतर’ ही कादंबरी तृतीयपंथी समाजाच्या वेदना, संघर्ष, आत्मसन्मान आणि नव्या ओळखीच्या प्रवासाचा भावस्पर्शी दस्तऐवज आहे. समाजातील उपेक्षित घटकांच्या वास्तवाला साहित्यिक अभिव्यक्ती देत ही कादंबरी वाचकांना अंतर्मुख करणारी ठरली आहे. कार्यक्रमात ग्रंथपरिचयासोबतच या कादंबरीवर आधारित एकपात्री रंगमंचीय आविष्कार प्रसिद्ध रंगकर्मी पराग घोंगे यांच्याद्वारा सादर करण्यात येणार असून, साहित्य आणि रंगकलेचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे.
साहित्यप्रेमी व नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक सिद्धिविनायक ट्रस्टद्वारा करण्यात आले आहे.