spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘पुढाऱ्यांनो, सेवेची कसोटी लावा’ !

भारतीय राज्यघटनेनुसार, नागरिकांना मिळालेल्या मतदानाच्या हक्काचे महत्त्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेतून कित्येक वर्षांपूर्वीच मांडले. निवडणुकीचे महत्त्व पटवून सांगताना निवडणुकीतील सदोष प्रथांवरही त्यांनी प्रहार केले. निवडणुकीत कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, असा सल्ला नागरिकांना देतानाच ‘पैशांची नव्हे तर सेवेची कसोटी लावा,’ असे आवाहन त्यांनी पुढाऱ्यांना केले. राष्ट्रसंतांचे त्या काळचे विचार आजच्या राजकीय व्यवस्थेतील जळमटे दूर करण्यासाठी प्रभावीपणे लागू होतात.

मत हे दुधारी तलवार |

उपयोग न केला बरोबर |

तरि आपलाचि उलटतो वार |

आपणावर शेवटी ||

निवडणूक प्रक्रियेमध्ये आज विकासकामांपेक्षा पैशांनाच अधिक महत्त्व प्राप्त झाल्याची स्थिती आहे. जो उमेदवार अधिक पैसा खर्च करू शकेल, तोच मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहचू शकेल. निवडणूक लढविणे हे सर्वसामान्यांचे काम नाही, अशा व्याख्याच जणू आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी करून ठेवल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या नेत्यांनाही पक्षश्रेष्ठी पाठीशी घालतानाचे चित्र आज पाहायला मिळते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत ‘संघटन शक्ती’ या प्रकरणात निवडणूक प्रक्रियेतील दोषांवर प्रहार करत उमेदवार आणि मतदारांना उपदेश केला.

मतदारांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता योग्य नेत्याची निवड करणे यातच राष्ट्राचे हित आहे. त्यामुळे निवडणुका पारदर्शक होणे हेच लोकशाहीचे बळ असल्याचा संदेश राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून दिला आहे. निवडणुकीत घरी न बसता प्रत्येकाने मत देण्याचा सल्लाही राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून दिला.

राष्ट्रसंतांचा उमेदवारांना संदेश…

स्वार्थासाठी सेवेचे सोंग करू नका

प्रलोभन देऊन मते मिळवू नका

व्यसनी गुंडांना प्रोत्साहन नको

नेत्यांनो, फुटीर वृत्ती टाळा

मते मिळविण्यासाठी दारूचा वापर नको

आपल्या प्रचारातून जनतेच्या हिताचा आलेख मांडा

प्रचार म्हणजे आरडाओरडा करून गोंधळ घालणे नव्हे

निवडणुकीतील सदोष प्रथांना तिलांजली द्या

पक्षपात न करता गरिबांच्या हक्कासाठी उभे राहा

मतदारांनो…

नाती, गोती, पक्ष, पंथ, जातपात, गरीब-श्रीमंत, देवघेव या आधारावर मत देऊ नका.

राष्ट्राचे हित तुमच्या एका मतावर अवलंबून आहे.

राजकारणातील दोष बघून निराश होऊ नका, जाणत्या नेत्यांना निवडा.

चुकीच्या व्यक्तीला मत देणे म्हणजे आगीत बारुद ओतण्यासारखे आहे.

भ्रष्ट लोकांमधून प्रामाणिक व्यक्तींची निवड करा.

देशाच्या हितासाठी संघटनेचा प्रमुख शुद्धचारित्र्याचा असावा.

जनतेची कामे न करणाऱ्या नेत्यांना जागा दाखवा.

निवडणूक ही भविष्याची अचूक संधी आहे.

जनतेसाठी काम करणारा उमेदवार याच निकषावर आपला नेता निवडा.

– रुपेश प्रकाशराव वाळके

संत्रा उत्पादक शेतकरी मू पोस्ट दापोरी तालुका मोर्शी जिल्हा अमरावती


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.