अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान घोटाळ्यांवर चर्चा
मुंबई १९ : एमबीबीएस, बीएएमएस तसेच अन्य वैद्यकीय व आरोग्य शिक्षण अभ्यासक्रमांत प्रवेश देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या पालकांकडून खाजगी व्यक्ती व एजंटकडून करोडो रुपयांची फसवणूक सुरू असल्याची गंभीर बाब आमदार अभिजित वंजारी यांनी सभागृहासमोर मांडली.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ही गंभीर बाब मांडताना राज्यातील काही प्रमुख तीन ते चार घोटाळ्यांचे मुद्दे चर्चेला आणले.
आमदार अभिजित वंजारी म्हणाले, सरकारी प्रवेश प्रक्रिया पारदर्शक असूनही काही खाजगी एजंट पालकांची दिशाभूल करीत लाखो रुपये त्यांच्याकडून उकळत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील व निम्न आर्थिक परिस्थितीतील पालक याला बळी पडत आहेत. याविरोधात सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी आणि अशा प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
त्याचबरोबर त्यांनी कृषी विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि अन्य विभागांत खासगी कंपनी व कंत्राटदारांमार्फत केले जाणारे आर्थिक घोटाळे अधिवेशनात उघडकीस आणले. पाणीपुरवठा योजनांमध्ये कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कृषी विभागाच्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभात गैरव्यवहार होत असल्याची माहितीही वंजारी यांनी दिली.
विधान परिषदेत आमदार वंजारी म्हणाले, खर्चाची प्रचंड रक्कम असूनही शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध पाणी व कृषी सेवा पोहोचत नाही. कारण मधल्या स्तरावर भ्रष्टाचार होत आहे. कंत्राटदार आणि काही अधिकारी मिळून हा प्रकार करतात. त्यामुळे संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. गडचिरोलीत धान भरडाईचा कंत्राट काही विशिष्ट राईस मिल मालकांनाच दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी प्रामुख्याने सांगितले.
अधिवेशनात आ. वंजारी यांनी यासंदर्भातील कागदपत्रे आणि व्हिडिओ पुरावे आपल्याजवळ असल्याचे सांगत सखोल चर्चा घडवून आणली.




