– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उप विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन !
– रुपेश वाळके यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे सध्या मोर्शी–चांदूर बाजार मार्गावरील येरला फार्म परिसरात, शहरापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर कार्यरत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून हे कार्यालय तात्काळ मोर्शी शहरातील नवीन तालुका प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र पवार तसेच कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी आगरकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करून केली आहे.
पूर्वी मोर्शी तालुका कृषी कार्यालय बसस्थानकाजवळील मनोरमा कॉम्प्लेक्स येथे असल्याने शेतकऱ्यांना सहजपणे आपली कामे करता येत होती. मात्र सुमारे आठ वर्षांपूर्वी कृषी विभागाने हे कार्यालय शहराबाहेर हलविले. सध्या कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही सोयीस्कर वाहतूक व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना एका फेरीसाठी जवळपास शंभर रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे.
तसेच कार्यालय परिसरात स्वच्छ पिण्याचे पाणी, स्थिर वीजपुरवठा आणि मोबाईल नेटवर्क यासारख्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि कर्मचारी दोघांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बहुसंख्य महिला कर्मचारी येथे कार्यरत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मोर्शी शहरातील इतर सर्व शासकीय कार्यालये अमरावती–वरूड मुख्य मार्गावरील नवीन तालुका प्रशासकीय इमारतीमध्ये किंवा शहरातच कार्यरत असताना तालुका कृषी अधिकारी कार्यालय मात्र अजूनही शहराबाहेर का ठेवले आहे, असा संतप्त सवालही रुपेश वाळके यांनी उपस्थित केला आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सोयीचा विचार करून मोर्शी तालुका कृषी अधिकारी कार्यालय तात्काळ शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित करावे, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी प्रशासनाला दिला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश घारड. तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, धनंजय अमदरे, राजेश ठाकरे, गजानन वानखडे, कांचन कुकडे, मनीष गुडधे, हितेश साबळे, अक्षय ढोमणे, अभिजित सावरकर यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.




