spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उबाठा गटाचा दसरा नव्हे तर ‘ विसरा व घसरा मेळावा ’ – भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा टोला

मुंबई :- वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला सोडत उबाठा गटाने काँग्रेससोबत सत्ता स्थापन करत मतदारांचा विश्वासघात केला होता. बाळासाहेबांनी सुरू केलेला दस-या मेळाव्यातून हिंदुत्वाचे धगधगते विचार सर्वदूर पोहोचायचे. पण आता उबाठा गटाचा दसरा मेळावा नाही तर बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडलेल्या उबाठा गटाचा हा ‘विसरा मेळावा’ आहे असा टोला भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी मारला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचे समस्त चेले हल्ली उठसूठ टोमणे मारत असून सर्वसामान्य जनतेवर घसरण्याचे काम करत असल्याने त्यांचा दसरा मेळावा नसून ‘घसरा मेळावा’ आहे. दसरा मेळाव्यात मुस्लीम अनुनयात रममाण असलेले उद्धव ठाकरे अबू आझमींच्या वक्तव्यांचा निषेध करणार का ? असा सवालही बन यांनी केला.

यावेळी बन म्हणाले की, उबाठा गट काँग्रेसचा एजंट बनला असल्याने हिंदुत्व विरोधी भूमिका घेत आहेत. दसरा मेळाव्यातही याचीच पुनरावृत्ती होईल. एकीकडे वंदनीय बाळासाहेबांचा खणखणीत आवाजातून भरलेला हिंदुत्वाचा हुंकार होता तर दुसरीकडे टोमणे सम्राट उद्धव ठाकरे असणार आहेत अशी खिल्लीही त्यांनी उडवली. स्व. बाळासाहेब ठाकरे उभ्या हयातीत कधी सोनिया गांधींच्या, काँग्रेसच्या दारात गेले नाहीत. कधी दिल्ली पुढे झुकले नाहीत. बाळासाहेबांनी मराठी माणसाला जागे करण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे नेहमीच उभे राहिले होते याची आठवण राऊत यांनी ठेवावी.

ज्यांनी मुंबईवर,पत्राचाळीवर दरोडा टाकून मराठी माणसांना लुटले, कोवीड काळात मुंबई महापालिकेची लूट केली, 2019 साली जनादेशावर दिवसाढवळ्या दरोडा टाकून काँग्रेस सोबत सत्तेत बसले त्यांनी चोर बाजाराची भाषा करत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करू नये असे बन यांनी खडसावले.

सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही

राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात मात्र त्याबद्दल उबाठा गट, राऊत चकार शब्द काढताना दिसत नाहीत. सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधींना जाब विचारण्याचे धारिष्ट्य राऊत कधी दाखवणार अशी कोपरखळी बन यांनी लगावली.

सोनिया गांधींना जाब विचारण्याची हिंमत राऊतांनी दाखवावी

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यावेळचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी हे पाकिस्तानचे त्यावेळचे पंतप्रधान गिलानी यांच्याबरोबर क्रिकेट सामना पहात असल्याचे छायाचित्र दाखवित बन म्हणाले की संजय राऊत हे सोनिया गांधी, राहुल गांधी यांना याबाबत जाब विचारण्याची हिंमत दाखविणार का ? उद्धव ठाकरेंनी याबाबत दसरा मेळाव्यातून राहुल गांधींना प्रश्न विचारावा असे आव्हानही बन यांनी दिले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.