हंसराज,भंडारा (गणेशपूर):- आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला असताना, गणेशपूर येथील चित्रा वैद्य यांनी आपल्या राहत्या घरी काढलेली विठ्ठल-वारकऱ्यांची अद्भूत रांगोळी सध्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.एका भक्ताच्या अंतःकरणातील भाव या रांगोळीत स्पष्टपणे उमटले आहेत.
चित्रा वैद्य या केवळ एक गृहिणी नसून, गणेशपूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या आहेत. राजकारण आणि समाजकारणाच्या धबडग्यातही त्यांनी आपली कला जोपासली आहे. ग्रामीण विकासाच्या प्रश्नांसाठी नेहमीच ‘फ्रंट फूट’वर खेळणाऱ्या आणि जनतेच्या हक्कासाठी प्रशासनाशी झगडणाऱ्या चित्राताईंचे हे सुप्त रूप पाहून ग्रामस्थ थक्क झाले आहेत.
त्यांनी रेखाटलेल्या रांगोळीत विठ्ठलाचे रूप आणि वारीतील वारकऱ्यांचा उत्साह इतक्या जिवंतपणे साकारला आहे की, जणू काही गणेशपुरातच ‘भक्तीचा महापूर’ आला आहे. “गावाचा विकास असो वा कलेची जोपासना दोन्ही क्षेत्रांत तितक्याच समर्पितपणे कार्य करणे हीच खरी लोकसेवा,’ हेच चित्रा वैद्य यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.”
लोकप्रतिनिधी जेव्हा अशा प्रकारे कलेतून संस्कृती जपतो, तेव्हा समाजाला एक नवी दिशा मिळते. चित्रा वैद्य यांच्या या कलेचे आणि त्यांच्या लढाऊ व्यक्तिमत्त्वाचे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात कौतुक होत आहे.





