spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सर्वसामाण्यांना मदतीची भूमिका लोकप्रतिनिधींनी स्वीकारावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर :- सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन वेळप्रसंगी कायदा व लालफितीत न अडकता आवश्यकतेनुसार कायदे बदलण्याची तयारी लोकप्रतिनिधींनी ठेवावी यासाठी संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या आयुधांचा वापर करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

विधानपरिषद सभागृहात राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे ‘लोकप्रतिनिधींची मतदार संघांप्रती असलेली जबाबदारी आणि त्यासाठी सभागृहाच्या माध्यमातून उपलब्ध असलेले संविधानीक व्यासप‍ीठ’ या विषयावर मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानमंडळाच्या सचिव मेघना तळेकर उपस्थित होत्या.

मतदारसंघातील नागरिकांनी मला निवडून दिले. त्यामुळे मला त्यांच्यासाठीच काम करायचे आहे, ही भावना सतत जोपासण्याची आवश्यकता व्यक्त करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लोकांच्या आयुष्यातील दु:ख कमी करून आनंदाने समाधान देण्यासाठी मिळालेल्या पदाचा पुरेपूर वापर करायला हवा. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे दु:ख कळायला हवे आणि ते सोडविण्यासाठी संविधानाच्या सर्व मार्गांचा अवलंब केल्यास मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांचे जीवन सुसह्य होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

लोकशाही हे पवित्र मंदिर आहे आणि सर्वसामान्‍य जनता हेच माझे दैवत आहे. याच भावनेतून एक चांगला लोकप्रतिनिधी होण्यासाठी चांगला विद्यार्थी होणे गरजेचे आहे. मी आजही स्व:ताला विद्यार्थीच समजतो अशी भावना व्यक्त करताना शिंदे म्हणाले की, लोकशाही प्रणाली लोकाभिमुख व्हावी अशी माझी कायम भुमिका आहे. लोकशाही म्हणजे जनता आणि लोकप्रतिनिधी या दोघांमध्ये वाहणारी पवित्र गंगा आहे. ही विकासाची गंगा सदैव प्रवाह‍ित ठेवणे, प्रदूषित होऊ न देणे ही शासनाची आणि प्रशासनाची जबाबदारी असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याच्या संसदीय कार्यप्रणालीतील परंपरा सर्वोच्चाने दिमाखदार असून पक्षीय भेदाकडे जाऊन पीठासीन अधिकाऱ्यांनी लोकशाहीची प्रतिमा जपलेली आहे. यामध्ये ग.वा. मावळणकर, वि.स. पागे, रा.सू. गवई, जयंतराव टिळक, ना.स. फरांदे, मधुकरराव चौधरी, दत्ताजी नलावडे, अरुण गुजराती यांच्यापासून आजपर्यंतच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी जपली आहे. शाखा प्रमुखापासून सुरू झालेल्या राजकीय प्रवासामध्ये सातत्याने कॉमनमॅन आता डेडिकेटेट टू कॉमनमॅन समजत असल्यामुळेच सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. लोकांच्या आयुष्यातील दु:ख कमी करून आनंदाने समाधान आणण्यासाठी मिळालेल्या पदाचा पुरेपूर वापर केल्याने यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींची मतदारसंघाप्रती असलेली जबाबदारी या विषयासंदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण व गरिबांना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, जीवनदायी योजनेत पाच लाखापर्यंतचे उपचार तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमतून अडीच वर्षात 80 हजार रुग्णांना सुमारे 450 कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यासोबतच शासन आपल्या दारी सारख्या योजनेचा सुमारे 5 कोटी लोकांनी लाभ घेतला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या इच्छा- आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे समाधान असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

प्रारंभी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन निलेश मदाने यांनी तर आभार प्रदर्शन विधिमंडळाच्या सचिव मेघना तळेकर यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.