नागपूर ९ : आम्ही अनेक वर्षापासून राजा आणि प्रजा या गुलामीच्या चक्रात अडकलो होतो. संविधानकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला संविधान दिल्याने 26 जानेवारी 1950 पासून राज्यकर्ते आणि लोक ही संकल्पना उदयास आली. असे मनोगत भारतीय संविधानाचे तज्ञ प्रा देविदास घोडेस्वार यांनी व्यक्त केले.
प्रा देविदास घोडेस्वार हे भारतीय संविधान प्रचारक संघ द्वारा आयोजित कही हम भूल ना जाये या संविधान जनजागृती अभियानांतर्गत “संविधान उद्देशिका भारत का व्हीजन डॉक्युमेंट” या विषयावरील व्याख्यानात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. हे व्याख्यान लष्करी बागेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन हॉल येथे संपन्न झाले.
याप्रसंगी प्रा घोडेस्वार यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेतील समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता या मानवी जीवन मूल्याचे विस्तृतपणे विश्लेषण केले. भारताचे संपूर्ण संविधान व संविधानाची प्रास्ताविका कशी बनली त्या मागची संपूर्ण पार्श्वभूमी याप्रसंगी त्यांनी कथन केली. एवढेच नव्हे तर भारताला उच्च शिखरावर नेण्यासाठी भारतीय संविधान हे व्हिजन डॉक्युमेंट कसे? आहे हे सुद्धा समजावून सांगितले. यावेळी मंचावर संविधानाच्या हिंदी व इंग्रजीच्या मूळ प्रति ठेवण्यात आल्या होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुनंदा कोचे होत्या. पाहुणे म्हणून रेवनदास लोखंडे, सीएम चव्हाण होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वामन सोमकुवर यांनी, सूत्रसंचालन छाया बेहेरे यांनी, तर समारोप उत्तम शेवडे यांनी केला. याप्रसंगी दिशा ह्यूमन वेल्फेअर सोसायटी, बुद्धिस्ट गोल्डन एरा फाउंडेशन, वंदना संघ, डॉ बाबासाहेब आंबेडकर मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जनजागृती नाटिका सादर करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अस्मिता तिडके, सुनील गजभिये, चंद्रकांत सोमकुवर, टीके रंगारी, सुरज रोडगे, जयंत साठे, नरेश महाजन, प्रदीप कराडे, प्रशांत मुनघाटे, छाया खोब्रागडे, रेखा लोखंडे, रजनी तायडे, पुष्पा घोडके, अर्चना टेंभुर्णी, वर्षा सहारे, सोनाली बेहेरे, प्रिया गजभिये आदींनी विशेष परिश्रम घेतले.




