नवी दिल्ली १३ – भारत आणि अमेरिकेत टॅरिफविषयक तणाव वाढत असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दबाव आणण्यासाठी नवा डाव खेळला आहे. ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला असून, आधीच लागू असलेल्या २५% टॅरिफवर आणखी २५% वाढ होणार असल्याचे संकेत दिले आहेत. भारताने त्यांच्या अटी मान्य करेपर्यंत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
भारताने जर या अटी मान्य केल्या, तर त्याचा थेट फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसू शकतो. भारतीय बाजारपेठेत अमेरिकन कंपन्यांची मोठी उलाढाल होते. त्यामुळे भारताने प्रतिकार म्हणून त्या कंपन्यांवर कारवाई केल्यास अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का लागू शकतो.
दरम्यान, अमेरिकेने भारतावर दबाव वाढवण्यासाठी पाकिस्तानचा वापर सुरू केल्याचे दिसत आहे. इस्लामाबादमध्ये झालेल्या पाकिस्तान-अमेरिका दहशतवादविरोधी संवादानंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात अमेरिकेने पाकिस्तानच्या भूमिकेचे कौतुक केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शेअर केलेल्या या निवेदनात दहशतवाद रोखण्यात पाकिस्तानने मिळवलेल्या यशाची प्रशंसा करण्यात आली.
अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आणि जगात शांतता व सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटनांविरुद्ध पाकिस्तानच्या कारवाईचे समर्थन केले. हे सर्व त्या पार्श्वभूमीवर घडले, जेव्हा काही दिवसांपूर्वी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातून आलेले दहशतवादी सहभागी असल्याचे उघड झाले होते. या हल्ल्यात हिंदू भाविकांना लक्ष्य करण्यात आले होते. तरीदेखील अमेरिकेकडून पाकिस्तानचे कौतुक झाल्याने भारताच्या नाराजीला वाव मिळाला आहे.




