चंद्रपूर :- एकीकडे सनई-चौघड्यांचा सूर आणि दुसरीकडे घराच्या कुलुपावर चोरांची नजर! चंद्रपूरच्या रामनगर भागात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका इंजिनिअरचं कुटुंब मोठ्या उत्साहाने लग्नासाठी बाहेर गावी गेलं आणि मागे चोरांनी त्यांच्या घराचा पार ‘कोळसा’ केला. ‘होत्याचं नव्हतं झालं’ अशी वेळ आता या कुटुंबावर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इंजिनिअर आपल्या कुटुंबासह लग्नकार्यासाठी शहराबाहेर गेले होते. घर बंद असल्याचा फायदा उठवत अज्ञात भामट्यांनी त्यांच्या बंद घराला टार्गेट केलं. अत्यंत शिताफीने घराचं कुलूप तोडून चोरांनी घरात प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला.
घरफोडी करणाऱ्यांनी केवळ चोरीच केली नाही, तर पोलिसांना कोणताही सुगावा लागू नये याची पूर्ण खबरदारी घेतली होती. मात्र, इंजिनिअर जेव्हा लग्नावरून परतले, तेव्हा घराचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं आणि आयुष्यभराची पुंजी लंपास झाली होती.
पोलिसांसमोर चोरांचं आव्हान!
या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पंचनामा सुरू असून ठसेतज्ज्ञ आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरांचा माग काढला जात आहे. चंद्रपुरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, ‘पोलीस या फिल्मी स्टाईल चोरांना बेड्या ठोकणार का?’ याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




