– शेतकरी, महिला, युवा आणि सर्वसामान्य नागरिक ‘यवतमाळ महोत्सवा’चा केंद्रबिंदू
Ø पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे प्रतिपादन
यवतमाळ :- राज्य शासनाच्या विविध जिल्हास्तरीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यामाने कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्र येथे आयोजित दि. 27 मार्च ते 31 मार्च या पाच दिवसीय भव्य ‘यवतमाळ महोत्सव 2026’ चे उद्घाटन पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री ना. प्रा. अशोक उईके, आ. राजू तोडसाम, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. किसन वानखेडे, आ. सजय देरकर, यवतमाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, विभागीय आरबीडीसी पवन देशमुख, सहयोगी संशोधन संचालक डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिपक कच्छवे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री ना. संजय राठोड म्हणाले की, यवतमाळ महोत्सव हे केवळ प्रदर्शनी नाही, तर हा शेतकरी केंद्रीत आणि त्यांच्या प्रगतीचा उत्सव आहे. यात कृषी महोत्सव व पशु प्रदर्शन होत आहे जिथे आधुनिक शेती आणि नव्या पशू जातींची माहिती दिली जात आहे. उमेदमार्फत समृद्ध मिनी सरस व माविममार्फत नवतेजस्विनी प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या कष्टाला बाजारपेठ मिळाली आहे. सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याची कला-संस्कृती जोपासली जात आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातुन वाचन संस्कृतीला चालना दिली जात आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरांच्या माध्यमातून शेतकरी व महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांचे महसूल विषयक कामे एकाच ठिकाणी होत आहे. या यवतमाळ महोत्वाच्या माध्यमातून विविध सेवांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करुन येत्या नोव्हेंबरमध्ये पुन्हा अशा भव्य महोत्सवाचे आयोजन करुन शेतकरी, महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा- आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके
आदिवासी विकास मंत्री ना. प्रा. अशोक उईके यांना या महोत्सवाचे कौतूक करुन ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने आदिवासी महिलांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पुढील काळामध्ये आदिवासी बहीण इतरांना रोजगार देणारी बहीण निर्माण झाली पाहिजेत तसेच लखपती दिदि झाली पाहिजेत हा उद्देश आणि हेतू समोर ठेवून ही योजना यशस्वी करुन वंचित, विकासापासून केले दूर असलेल्या महिलांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच या महोत्सवाच्या माध्यमातून गरजू लोकांना प्रबोधनातून मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाच्या सदैव पाठिशी राहिल, अशी ग्वाही दिली.
उद्घाटन समारंभाच्या शेवटी, पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त शेतकरी, राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेअंतर्गत वारसदारांना लाभाचे प्रमाणपत्र, माविमच्या महिला बचत गटांना अनुदान प्रमाणपत्र आणि ॲट्रॅासिटी बाधितांच्या वारसांना नियु्क्ती पत्राचे वाटप करण्यात आले.