खापा :- केळवद गावातील मुख्य मार्गावरील जीर्ण व अत्यंत धोकादायक पुलाच्या नवीन बांधकामासाठी निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही. त्यामुळे स्थानिक युवक अक्षय भुजाडे सह इतरांनी पुलाखालील घाण पाण्यात उतरून रविवारी (२८ डिसेंबर) आंदोलन सुरू केले.
या पुलामुळे नागरिकांचा जीव सातत्याने धोक्यात आला आहे. मागील आठवड्यात याच पुलावरून एक वृद्ध महिला खाली पडली. त्यांना गंभीर दुखापत झाली. या घटने नंतरही प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतली नाही. परिणामी, शनिवारी (२७ डिसेंबर) एक कार थेट पुलावरून खाली कोसळली. मोठी जीवितहानी टळली. साधे बॅरिकेड्स पुलाला नसल्याने या घटना घडत असल्याचा आरोप आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अक्षय भुजाडे यांनी घाण पाण्यात उतरून अनोखे आंदोलन सुरू केले. निधी मंजूर असूनही पूल बांधला जात नाही आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी साधे बॅरिकेड्स लावायलाही प्रशासन तयार नाही. माणसाच्या जिवाची किंमत शून्य असेल तर घाण पाण्यात उतरून प्रशासनाला जागे करणार, असा त्यांनी थेट इशारा दिला.
एखादा बळी गेल्यावर काम सुरू होणार आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. आंदोलनाची सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने शेकडो महिला, पुरुष, युवक व युवती आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला व घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अक्षय भुजाडे यांच्यासोबत आपचे शहरप्रमुख मोरेश्वर वाघमारे सहभागी होते.




