– मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून अर्थसंकल्पात १२४० कोटी रुपयांची तरतूद
– खिंडशीत झिंगा संवर्धनाचा मंत्री जयस्वाल यांच्या हस्ते शुभारंभ
सचिन चौरसिया, प्रतिनीधी रामटेक :- मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून खिंडशी येथे मंजूर झिंगा संवर्धन प्रकल्पाचा शनिवारी राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन तसेच प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत खिंडशी जलाशयात प्रायोगिक तत्त्वावर गोड्या पाण्यातील झिंगा संवर्धनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची किंमत ७ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. पूर्वी नीलक्रांती योजना राबविण्यात आली होती, त्यानंतर प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना कार्यान्वित करण्यात आली. याच धर्तीवर मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना अर्थसंकल्पात जाहीर केली असून, त्यासाठी १२४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या प्रकल्पाचे शुभारंभ सोमवारी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ४ लाख झिंगे खिंडशी तलावात सोडण्यात आले. हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार असून मच्छीमार बांधवांनी मोठ्या प्रमाणात याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री आशिष जयस्वाल यांनी केले. तसेच मच्छीमार बांधवांनी संघटित होऊन शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घेणे आवश्यक आहे, असे मत मांडले. याप्रसंगी रामटेकचे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ हैदराबाद सदस्य प्रकाश लोणारे, प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय नागपूर सुनील जांभुळे, सहयोगी अधिष्ठाता मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूरचे प्रशांत तळवेकर, डॉ राजीव राठोड सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नागपूर, शुभम कोमरेवार, नगरपंचायत पारशिवणीचे उपाध्यक्ष दिपक शिवरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे, फिशरमन मल्टिपरपज को ऑ.सोसायटी रामटेकचे अध्यक्ष दुर्गेश केळवदे, उपाध्यक्ष सेवक नागपुरे, माणिक ताकोद, व्यवस्थापक उमाशंकर बागडे, सदस्य अशोक डहारे, वसंता अहिरकर, सतीश उरकुडे, राहुल ढगे, रवींद्र दुधपचारे, दिवाळू नागपुरे, सतीश क्षीरसागर, हर्ष कनोजे यांच्यासह मच्छीमार समाजबांधव उपस्थित होते.
जागतिक स्तरावर गोड्या पाण्यातील मासळीला मोठी मागणी
नागपूरमध्ये आवश्यक असलेल्या मासळीपैकी केवळ ५० टक्के मासळी स्थानिक स्तरावर उपलब्ध होत असून उर्वरित ५० टक्के बाहेरून आणावी लागते. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या विविध जलस्रोतांचा प्रभावी वापर करून मत्स्य उत्पादन वाढवणे गरजेचे आहे, असेही नमूद केले. प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत आहे, असेही राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले.