– रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीची चळवळ उभी करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
गडचिरोली :- कृषी विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (FPC) एकदिवसीय खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आगामी खरीप हंगामाचे नियोजन, हवामान बदल आणि शाश्वत शेती पद्धतींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शन आणि आवाहन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) श्रीमती प्रिती हिरळकर यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना सेंद्रिय शेतीची मोठी चळवळ उभी करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, युरीया आणि डीएपी (DAP) सारख्या रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी सेंद्रिय स्व निर्मित खतांवर भर द्यावा. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा. जैविक निवीष्ठा संसाधन केंद्र (BIRC) मार्फत निर्मित निविष्ठांचा वापर करण्यावर भर देत, ‘एल निनो’ (Al Nino) सारख्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सतर्क राहून उपाययोजना कराव्यात. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी बांबू, सीताफळ, शेवगा यांसारखी फळझाडे आणि तूर, उडीद यांसारख्या डाळवर्गीय पिकांसह शिंगाडा लागवडीकडे वळावे.असे आव्हान केले.
कृषी विज्ञान केंद्र (KVK), सोनपूरचे विषय विशेषज्ञ डॉ. प्रीतम चिरडे यांनी तांत्रिक सत्रात मार्गदर्शन करताना खालील बाबींवर भर दिला: सेंद्रिय पीक पद्धतीमध्ये भात पिकामध्ये हिरवळीची खते आणि कमी व मध्यम कालावधीच्या वाणांची निवड करावी. भात लागवडीसाठी पट्टा पद्धत, DSR (थेट पेरणी) पद्धत आणि अझोलाचा वापर करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. पुष्पक बोथीकर (विषय विशेषज्ञ, KVK) यांनी रासायनिक व सेंद्रिय पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापनाची सविस्तर माहिती देऊन BIRC निर्मित निविष्ठा वापरण्याचे सुचवले.
MCDC चे विभागीय व्यवस्थापक दीपक बेदरकर यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता सेवा उद्योग उभारण्याचे आवाहन केले. यामध्ये कृषी निविष्ठा केंद्र, सल्ला केंद्र, शेतमाल तारण योजना आणि गोदाम उभारणीचा समावेश असावा. तसेच स्प्रे पंप, bardana ताडपत्री सारख्याआवश्यक साहित्यांचे वितरण कंपन्यांमार्फत व्हावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी किशोर चौधरी यांनी मृद परीक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत ग्राम स्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा VSTL मार्फत सेवा घेण्याचे आवाहन केले.

