मुंबई :- महाराष्ट्र महापौर परिषदेची २३ वी बैठक अंधेरीत महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्ष व मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या परिषदेचे आयोजन अखिल भारतीय स्थानिक स्वराज् संस्थेने त्यांच्या जुहू गल्ली येथील सभागृहात महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष व अखिल भारतीय स्थानिक स्व्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी केले होते.या बैठकीत नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची महाराष्ट्र महापौर परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.रणजित चव्हाण यांनी महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष रितू तावडे,उपाध्यक्ष नीता ठाकरे आणि उपस्थित सर्व महापौरांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
या बैठकीला कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, संयोजक लक्ष्मणराव लटके,ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळकर,मीरा भाईदरच्या महापौर डिंपल मेहता,वसई विरारचे महापौर अजीव पाटील,नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील,कल्याण डोंबिवलीच्या महापौर हर्षाली चौधरी थवील,भिवंडी निजामपूरचे महापौर नारायण चौधरी,धुळेच्या महापौर मायादेवी परदेशी,अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी,इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे,कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम,जालनाच्या महापौर वंदना मगरे,परभणीचे महापौर इकबाल खाजा, नांदेड वाघाळाच्या महापौर कविता मुळे आदी राज्यातील विविध महानगरपालिकेचे महापौर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात रितू तावडे म्हणाल्या की,अखिल भारतीय स्थानिक स्वराज् संस्थेच्या शतकी महोत्सवी वर्षात मला महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्षाचा बहुमान मिळाला.सुमारे साडेचार वर्षानंतर महाराष्ट्र महापौर परिषदेच्या रूपाने राज्यातील महापौरांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. आपले प्रश्न मी अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहे. लवकरच त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र महापौर परिषदेची बैठक मी मुंबईत आयोजित करणार आहे.
महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, राज्यातील महापौरांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी २०१२ साली त्याळेचे महापौर सुनील प्रभू यांच्या अध्यतेखाली महाराष्ट्र महापौर परिषदेची स्थापना झाली. १९२६ साली अखिल भारतीय स्थानिक स्व्वराज्य संस्थेची स्थापना झाली. मुंबईत मुख्यालय असून देशात ५० ठिकाणी शाखा आहेत.
महाराष्ट्र महापौर परिषदेच्या राज्यात २०१२ पासून २१ बैठका झाल्या आणि १०१ ठराव मंजूर झाले. शासनाकडे पाठवलेले काही ठराव मंजूर झाले. तर शासनाकडे प्रलंबित ठराव मंजूर करण्याची जबाबदारी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्ष रितू तावडे यांच्या कडे आहे.
संयोजक लक्ष्मणराव लटके यांनी महापौरांचे कोणते अधिकार आहेत, कोणते ठराव प्रलंबित आहेत याची सविस्तर माहिती दिली.तर महाराष्ट्र महापौर परिषदेच्या कार्यालयीन सचिव निधी लोके यांनी महापौरांशी समन्वय साधण्यासाठी वॉट्सअप ग्रुप स्थापन करण्यात येईल असे सांगितले.

