नवी मुंबई :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून, या योजनेअंतर्गत आगामी दि. ०३ जून २०२६ रोजी महाबोधी गया मंदिर, बोधगया (बिहार) या तीर्थक्षेत्रासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई विभागातील पात्र ज्येष्ठ नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी केले आहे. या योजनेमुळे राज्यातील ६० वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील नागरिकांना हक्काची आणि सुरक्षित तीर्थयात्रा मोफत करणे शक्य झाले आहे.
राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या आध्यात्मिक , राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पात्र ठरणार्या लाभार्थ्यांचा प्रत्यक्ष प्रवास, निवास आणि भोजनाचा संपूर्ण खर्च शासनामार्फत केला जाणार आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीअभावी तीर्थयात्रेपासून वंचित राहणाऱ्या वृद्धांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. नियमांनुसार, एका पात्र व्यक्तीला या योजनेचा लाभ आयुष्यातून एकदाच घेता येणार असून, दि. ३ जून २०२६ रोजी सुटणारी ट्रेन ही थेट बिहारमधील बोधगया या जगप्रसिद्ध बौद्ध आध्यात्मिक केंद्राकडे रवाना होणार आहे.
या तीर्थयात्रेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे बंधनकारक असून, तिचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असावे. तसेच लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सातही जिल्ह्यांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असून, स्थानिक समाज कल्याण कार्यालये अर्जांची छाननी आणि पुढील प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहेत.
मुंबई विभागातील ज्या ज्येष्ठ नागरिकांना बोधगया येथे जाण्याची ओढ आहे, त्यांनी विनाविलंब आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून आपली नोंदणी पूर्ण करावी. या यात्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी शासनाच्या मोफत सुविधेचा लाभ घेऊन आपले तीर्थयात्रेचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन बाळासाहेब सोळंकी यांनी केले आहे.