– वनपरिक्षेत्रात मास्क वितरण व जनजागृती अभियान
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक:- नागपूर वनविभागांतर्गत पवनी (प्रादेशिक) वनपरिक्षेत्रामध्ये तेंदूपत्ता संकलन हंगामाच्या पार्श्वभूमीवर मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी विशेष जनजागृती व सुरक्षा अभियान राबविण्यात आले. जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वन विभागामार्फत मास्कचे वितरण करण्यात आले. सामूहिक वनहक्क प्राप्त गाव बोथिया पालोरा मध्ये मास्क चे वाटप करून तेंदु पत्ता संकलन करण्याऱ्या ग्रामस्थ्यांच्या सुरक्षित्तेसाठी अभिनव उपक्रम राबविण्यात याला. तेंदूपत्ता संकलनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील नागरिक जंगलात प्रवेश करतात. या कालावधीत वन्यप्राण्यांची हालचाल वाढलेली असते. त्यामुळे जंगलात काम करताना सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले. वन विभागाने तेंदूपत्ता संकलकांना वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगत जंगल हा वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास असल्याने त्यामध्ये जबाबदारीने वावरण्याचे आवाहन केले. विशेषतः अस्वल, बिबट, रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांच्या उपस्थितीची शक्यता लक्षात घेऊन सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रसंगी सामूहिक वनहक्क समिती, बोथिया पालोरा चे अध्यक्ष ईश्वर मरस्कोल्हे, सचिव धनराज उईके आणि सर्व ग्रामस्थ्यांनी वन विभागाचे धन्यवाद मानून, आपत्कालीन परिस्थितीत वन कर्मचारी, अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या हाकेला प्रतिसाद देतात आणि सर्वतोपरी मदत करतात असे मत व्यक्त केले. सदर उपक्रमाद्वारे वन विभागाने ग्रामस्थांमध्ये मानवी-वन्यजीव संघर्ष प्रतिबंध, वनसंवर्धन आणि वैयक्तिक सुरक्षितता याबाबत प्रभावी जनजागृती केली. हा उपक्रम डॉ. विनिता व्यास उपवनसंरक्षक, नागपूर व गोविंदा लुचे, सहाय्यक वनसंरक्षक, रामटेक यांच्या मार्गदर्शनाखाली सागर बनसोड वनपरिक्षेत्र अधिकारी, पवनी यांच्या उपस्थितीत वाय. बी. पाटील क्षेत्र सहाय्यक पवनी, विठ्ठल सोडगीर वनरक्षक, रोशन परतेती वनरक्षक, पंचबुद्धे वनरक्षक, इम्रत टेकाम वनमजूर आदींनी अथक परिश्रम घेऊन उपक्रम पूर्ण केला.
वन विभागाच्या सूचना
सकाळी आठच्या अगोदर आणि सायंकाळी चार नंतर जंगलात जाणे टाळणे, मोबाईल वर गाणे वाजवत जंगलात जाणे, एकट्याने जंगलात न जाता समूहाने जाणे, गटाने तेंदूपत्ता संकलन करणे, वन्यप्राण्यांच्या हालचाली आढळल्यास सुरक्षित अंतर राखणे तसेच तात्काळ वन विभागाशी संपर्क साधणे, अशा विविध सूचना उपस्थित ग्रामस्थांना देण्यात आल्या.