कामठी :- जून महिना अर्धा संपत आला तरीही कामठी तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. प्रखर उकाडा कायम असून मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि इतर शेती साहित्याची खरेदी करून तयारी पूर्ण केली आहे. मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणीला सुरुवात होऊ शकलेली नाही. त्यामुळे मुग, उडीद आणि सोयाबीन यांसारख्या प्रमुख खरीप पिकांच्या पेरणीवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
काही भागांत किरकोळ पाऊस झाला असला तरी त्यानंतर पुन्हा उघडीप पडल्याने पेरणीसाठी आवश्यक वातावरण तयार झालेले नाही. त्यामुळे शेतकरी आता लवकरात लवकर समाधानकारक पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास खरीप हंगामाला गती मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांसह कृषी विभाग आणि व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.







