– दोन घरी व एक शेतात असे तीन ठिकाणी चोरीच्या घटना
– कन्हान पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.
कन्हान :- परिसरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असुन चोरट्यांचा धुमाकुळ दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच रात्री टेकाडी गावातील दोन बंद घरे फोडुन रोख रक्कम व मौल्यवान वस्तुंवर डल्ला मारण्यात आला, तर खंडाळा शिवारातील शेतातुन ४५ हजार रुपये किमतीचा सोलर पंप चोरी करण्यात आला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन कन्हान पोलिसांच्या ग्रस्त व गुन्हे प्रतिबंधक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

टेकाडी गावात एकाच रात्री दोन घरफोडी
प्राप्त माहितीनुसार टेकाडी येथील रहिवासी नंदकिशोर लेकुरवाळे हे कुटुंबासह देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. घरातील सामान अस्ताव्यस्त फेकुन कपाटातील २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याच परिसरातील मनोज लेकुरवाळे हे देखिल देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असतांना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडुन प्रवेश करित कपाटातील साड्या, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तु चोरी करून नेल्या. सलग दोन घरफोड्यांच्या घटनांमुळे टेकाडी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी सुनिल लेकुरवाळे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

खंडाळा शिवारातील शेतातुन सोलर पंप चोरी
नागपुर येथील रहिवासी नंदकिशोर बिसनलाल गौर यांच्या खंडाळा शिवारातील शेतातुन ही चोरीची घटना उघडकीस आली. नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महा मार्गावरील कुंभलकर ढाब्यासमोरील त्यांच्या शेतात बसविण्यात आलेला साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सोलर पंप अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. चोरी गेले ल्या पंपाची किंमत सुमारे ४५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. नंदकिशोर गौर यांनी दिलेल्या तक्रारी वरून कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.
कन्हान परिसरात वारंवार होत असलेल्या चोरी च्या घटनांमुळे नागरिकांमध्ये कन्हान पोलीसावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कारण या अगोदरच्या चोरीचे आरोपी पकडण्यात आले नाही, काही चो-यांचे गुन्हे दाखल होत नसल्याने चोरांचे हौसले बुंलद होत दिवसे दिवस चोरीच्या घटना वाढु लागल्याने रात्रीच्या गस्तीत वाढ करून चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे. अन्यथा नागरिकां च्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







