खापा, वार्ताहर :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागातर्फे कृषी फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उद्यान पंडित पुरस्कार देण्यात येतात. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कोच्छी येथील प्रगतिशील शेतकरी भगवंत गुलाबराव बनसिंगे यांना राज्य सरकारचा नागपूर विभागातील उद्यान पंडित पुरस्कार सन २०२४ जाहीर झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सावनेर तालुक्यासह नागपूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भगवंता गुलाबराव बनसिंगे हे प्रगतिशील, प्रयोगशील व दूरदृष्टी असलेले फलोत्पादक शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांनी तंत्रज्ञानाधारित शेती, शाश्वत शेती पद्धती, शेतीत राबविलेले प्रयोग, शेतीला जोडधंद्याची साथ, शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून व शेती मध्ये रासायनिक खते न वापरता खर्चात मोठी बचत केली आहे. बनसिंगे यांनी सन २०२१ मध्ये जैविक निविष्ठाचा वापर करून आपली शेती फुलवली आहे. तसेच सामाजिक बांधिलकी या सर्व क्षेत्रातील त्यांचे भरीव कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने हा सन्मान जाहीर केला आहे.
फळबाग व्यवस्थापन मध्ये कुठल्याही प्रकारचे रासायनिक खते न वापरता पेरू, केळी, मोसंबी, आंबा, तुरी, कापूस व वेळेवर भाजीपाल्याचे नियोजन करतात नवीन नवीन प्रयोग करून चांगले उत्पादन घेतले आहे व जैविक निविष्ठा घरीच बनवून कंपोस्ट केलेले शेणखतावर भर देऊन शेतात प्रयोग करतात. तीन वर्षा पासून शून्य मशागत तंत्रज्ञानाचा करीत आहे.
तालुका कृषी अधिकारी, उप कॄषी अधिकारी व सहाय्यक कॄषी अधिकारी यांनी यांचे नवीन नवीन प्रयोग पाहून यांच्या कार्याची दखल घेतली आहे. येणाऱ्या १ जुलै २०२६ रोजी मंत्रालय मुंबई, महाराष्ट्र येथे मा. राज्यपाल महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे सावनेर तालुक्याचा नागपूर जिल्ह्यातील शेतकरी फलोत्पादक आणि कृषी क्षेत्रातील विविध घटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भगवंता गुलाबराव बनसिंग यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे त्यांच्या या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांना नव्या उमेदीने तंत्रज्ञानाच्या बडावर व शाश्वत शेतीच्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे.




