हंसराज भंडारा :- मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, भंडारा जिल्ह्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी ‘सांगवारी उपसा सिंचन योजने’चा प्रश्न विधानसभेत आक्रमकपणे मांडला. या योजनेसाठी आवश्यक असलेल्या निधीचा प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे प्रलंबित असून, यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अनावश्यक विलंब होत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
आमदार भोंडेकर यांनी सभागृहासमोर स्पष्ट केले की, सिंचनाच्या पुरेशा सोयींअभावी भंडारा जिल्ह्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून संकटात आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी त्यांनी २०२० मध्ये गोसीखुर्द प्रकल्पाच्या ‘बॅकवॉटर’मधून सांगवारी उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. या प्रस्तावाला २०२२ मध्येच प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, सर्व संबंधित विभागांच्या तांत्रिक मान्यतेनंतर आता हा प्रस्ताव केवळ निधीसाठी वित्त विभागाकडे अडकून पडला आहे.
७ हजार हेक्टर जमिनीला मिळणार फायदा: सध्या भंडारा जिल्ह्याला पेंच प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हे अंतर ७० ते ८० किलोमीटर इतके लांब असल्याने जिल्ह्यातील सर्वच भागात प्रभावीपणे सिंचन करणे शक्य होत नाही. सांगवारी उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यास भंडारा आणि मोहाडी तालुक्यातील सुमारे ५० ते ६० गावांमधील ७,००० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा मोठा लाभ मिळणार आहे.
निधी मंजूर करून निविदा काढण्याची मागणी: आमदार भोंडेकर यांनी राज्य सरकारकडे मागणी केली की, या प्रस्तावाला ‘फास्ट ट्रॅक’वर (त्वरीत) मंजुरी देण्यात यावी आणि येत्या दोन महिन्यांत या योजनेची निविदा प्रक्रिया (Tender Process) सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.




