नागपूर :- संवैधानिक अधिकार पक्षाचा स्थापना दिन व नियुक्तीपत्र वितरण समारंभ नुकताच नागपूर येथील रवीभवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष राजामणि एस. रॉय यांनी पक्षाची विचारधारा, उद्दिष्टे आणि भावी कार्ययोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. भारताच्या संविधानातील समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत प्रसार करणे हे पक्षाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, ओबीसी, अल्पसंख्याक तसेच वंचित समाजघटकांना शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि संविधानिक अधिकारांच्या क्षेत्रात योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देण्याला पक्ष सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण व्यवस्था विज्ञाननिष्ठ, नैतिक मूल्यांवर आधारित आणि आधुनिक विचार सरणीची असावी, तसेच अंधश्रद्धा व सांप्रदायिक तेच्या नावाखाली समाजात फूट पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक व्यवस्थेत सुधारणा, मतपेटी प्रणालीचा वापर, पक्षांतरावर नियंत्रण, मतांची खरेदी-विक्री रोखण्यासाठी कठोर कायदे, सरकारी शाळांचे सक्षमीकरण, शेतकरी हिताचे कायदे, संविधानाचे शिक्षण शालेय स्तरावर अनिवार्य करणे, करप्रणालीत सुधारणा, महिला सुरक्षा, पर्यावरण संरक्षण तसेच वैज्ञानिक, संशोधक, उद्योग व नवतंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याचा पक्षाचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात रिपब्लिक ऑफ इंडिया (खोब्रागडे गट) चे प्रदेशाध्यक्ष सनथ कुमार सोनी यांनी संवैधानिक अधिकार पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या कार्याचे कौतुक करत जनहितासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. मारोतराव गोरलेवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष, मनोज कुंभरे यांची राष्ट्रीय सचिव, वर्षा कन्हेरे यांची राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि धनजंय तितरे यांची महाराष्ट्र महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. समारंभात उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधान संरक्षण, सामाजिक न्याय आणि जनसेवेसाठी निष्ठेने कार्य करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शकुंतला गोरलेवार, विजयकांत शास्त्री, विष्णू तांडेकर, विलास कांबळे, संजीव कुमार नंदा, राजेश उइके, अब्राहम ठाकरेले, संतोष मंजारे, जॉय पटेल, जाजील रॉय, जिया रॉय, शांता, डॉ. मेरी धुर्वे, ग्रेस तांडेकर, चेतन भुसारी, विक्रम यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रहित, संविधान संरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या संकल्पाने करण्यात आला.




