– पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रस्ते पूर्ववत करण्यास प्राधान्य
चंद्रपूर :- अमृत 2.0 अंतर्गत “चंद्रपूर शहराकरिता मलनिस्सारण प्रकल्प” अंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या कामांनंतर सुरू असलेल्या रस्ते पुनर्स्थापना (Road Restoration) कामांची माननीय आयुक्तांनी भिवापूर वॉर्ड, हिंगलाज भवानी परिसर, एकोरी वॉर्ड आणि माता नगर या भागात प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, महानगरपालिका अधिकारी तसेच संबंधित कंत्राटदारांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या नवीन ठिकाणी कोणतेही उत्खनन न करता ज्या ठिकाणी मलनिस्सारण वाहिनीचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणचे रस्ते तातडीने पूर्ववत करण्यात यावेत. पावसामुळे रस्त्यांवर चिखल, पाणी साचणे तसेच नागरिक व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रोड रिस्टोरेशनची सर्व कामे प्राधान्याने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच, उर्वरित सर्व रस्ते पुनर्स्थापना कामे शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा. पावसाळ्यात सुरक्षिततेची सर्व आवश्यक खबरदारी घेऊन कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
पाहणीदरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, चंद्रपूर महानगरपालिकेचे अधिकारी तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.
शहरात अमृत 2.0 अंतर्गत चंद्रपूर शहराकरिता मलनिस्सारण प्रकल्प अंतर्गत एकूण ६९ कि.मी. मलनिस्सारण वाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यापैकी ४७ कि.मी. लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे असून त्यापैकी ४३ कि.मी. रस्त्यांचे पुनर्स्थापना (Road Restoration) काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ४ कि.मी. काँक्रीट रस्त्यांचे पुनर्स्थापना काम प्रगतीपथावर आहे. तसेच उर्वरित २२ कि.मी. रस्ते हे कच्च्या स्वरूपाचे असल्याने त्या ठिकाणी जीएसबी (Granular Sub Base) टाकून रस्ते वाहतुकीयोग्य करण्यात आले आहेत. उर्वरित सर्व कामेही लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्या सूचना माननीय आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना दिल्या




