– १५० नीम रोपांची लागवड; ऑगस्टपर्यंत प्रत्येक रविवारी वृक्षारोपणाचा संकल्प
कामठी :- पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भीलगाव शाखा, द युनायटेड एनजीओ आणि मी टू वी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 12 जुलै ला “बीज ते वृक्ष” अभियानाचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. अभियानाच्या पहिल्याच टप्प्यात सुमारे १५० नीमच्या अंकुरित रोपांची लागवड करून हरित भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
यावेळी डॉ. भोजराज यांनी देवलापार येथे तयार करण्यात आलेल्या अर्जुन वृक्षांच्या बियांची पेरणी केली, तसेच चिंचेच्या रोपांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमात स्वयंसेवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. परिसरात पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कलमना नगर संचालक दिलीप गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
याशिवाय खोजेंद्र माकडे, द युनायटेड एनजीओचे सर्व सदस्य, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.
आयोजकांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रत्येक रविवारी वृक्षारोपण व रोपसंवर्धन अभियान सातत्याने राबविण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक समाज घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी शैलेंद्र राव, संजय पवार, जितेंद्र प्रजापती, बाबाराव ढोंगे, प्रदीप बडगरे, अमोल केचे, अरविंद अग्रवाल, गोविंद राव लब्बा,राजकुमार फेरकुंडे,जगदीश तूप्पट यांच्यासह अनेक स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते.




