– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार
मुंबई :- परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची भूमिका मोदी सरकारने घेतल्यानंतर पोटात दुखू लागलेले संजय राऊत या कायद्याचा काय उपयोग, असे विचारताहेत. या देशात अराजकता निर्माण झाली पाहिजे, तरुणांची माथी भडकवून हा देश पेटला पाहिजे एवढाच तुमचा हेतू आहे. असा कायदा आल्यानंतर तरुणाई त्याचे स्वागत करेल हे तुम्हाला नको आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे आणि हा कायदा आल्यानंतर तरुणाई आणि जेन झी त्याचे स्वागत करेल. तुम्हाला मात्र कायदा नकोय, कारण तुम्हाला कायद्याने चालायचेच नाही, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला.
स्वतः मनकवडे असल्याचा दावा करणारे संजय राऊत मनकवडे नाहीत तर कवडीमोल आहेत. देवेंद्र फडणवीस जमादार आहेत, हवालदार आहेत का कमिशनर आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवल्याने ते तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचे आशीर्वाद देवेंद्र फडणवीसच्या पाठीशी आहेत. तुमच्या पाठीशी कोण आहे? तुमचा नेता आणि तुम्ही हवालदार नाही तर रायंदर झालात. गावागावात जाऊन लोकांचे मनोरंजन करणाऱ्या बहुरूप्या रायंदरासारखी तुमची अवस्था झाली आहे, अशी खिल्ली बन यांनी उडवली.
काँग्रेसने देशात आयआयटी, आयआयएम, एम्स उभे केल्याचा दावा संजय राऊत करतात. पण काँग्रेसच्या 60 वर्षांच्या काळात जितक्या आयआयटी, एम्स किंवा अत्याधुनिक संस्था होत्या, त्याच्या तीन पट जास्त संस्था उभ्या करत गेल्या बारा वर्षांत नवा भारत घडवल्यानेच देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीना तीन वेळा निवडून दिले. संजय राऊतांनी खासदार निधीतून एक कवडीतरी समाजासाठी खर्च केली का? पंचवीस वर्षे तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात. एक तरी संस्था, चांगला रस्ता, मैदान उभे केले का? एक शाळा तरी उभी केली का, असा सवाल बन यांनी केला.
नरेंद्र मोदी च्या धोतराची चिंता संजय राऊत, तुम्ही करू नका. तुमची चड्डी सुटली आहे ती आधी सांभाळा, असे सुनावत बन म्हणाले, तुम्ही आणि तुमचे नेते ‘आधे उधर जाव, आधे इधर जाव’ अशाच प्रकारची डायलॉगबाजी करत आहात. ‘मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू’ हा डायलॉग महाराष्ट्र विसरलेला नाही. नरेंद्र मोदीचे डायलॉग आणि काम देशातील जनतेला माहीत आहे. पण तुमचे कर्तृत्व काय? घरात आणि भांडुपच्या गाढव नाक्यावर बसायचे एवढेच तुमचे कर्तृत्व.
‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’ असल्याचे संजय राऊत यांनी मान्य केले आहे. हिंदुत्वाच्या पाठीत सुरा खुपसल्याने तुम्हाला वेगवेगळे वेश धारण करावे लागतात. कधी झुरळाचा, कधी हिरवा वेश धारण करताय. कधी काँग्रेसचे पांघरूण आपल्या अंगावर पांघरता. देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेने तुमचा नाटकीपणा पूर्ण ओळखला आहे. देशातील जनता तुम्हाला तुमची जागा दाखवत कधीही संधी देणार नाही, अशा शब्दात बन यांनी फटकारले.





