भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात
मुंबई :- संजय राऊत, तुम्ही जनरल लायर आहात तर तुमचा पक्ष हा जनरल डायपरसारखा झाला आहे. पक्षात सुरू असलेली गळती तुम्हाला थांबवता येत नाही आणि तुम्ही अमित शाह यांच्यावर टीका करता? ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला म्हणून संजय राऊतांचा पोटशूळ उठला आहे. परंतु एक लक्षात घ्या, अमित शाह नेतृत्व देशाने स्वीकारले आहे आणि त्यांच्या नेतृत्वात देश पुढे जातोय. जम्मू-काश्मीरमधील दगडफेकही कमी झाली पण तुमची पोटदुखी कमी व्हायला तयार नाही. आधी सारखा सारखा ओला होणारा आपला डायपर सांभाळा आणि मगच अमित भाईंवर टीका करा, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुलवामा किंवा पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा कुणी केला? गेल्या 70 वर्षांमध्ये 370 कलम काँग्रेसला हटवता आले नाही ते अमित शाह यांनी हटवले. दहशतवाद्यांच्या, नक्षलवाद्यांच्या विरोधात ते कंबर कसून लढत असल्याने संजय राऊत, तुम्हाला त्रास होतोय. पुण्यातील तज्ज्ञ समितीकडून लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार अमित शाह यांच्या उपस्थितीत अजित डोवाल यांना दिला जातो आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. लोकमान्य टिळक यांनी ज्या देशाभिमानी वृत्तीने इंग्रजांविरोधात लढा दिला, त्याचप्रमाणे अमित शाह लोकमान्य टिळकांचा आदर्श घेऊन पाकिस्तान, बांगलादेशला धडा शिकवत आहेत. इतरांना दुषणे देण्यापलीकडे काही जमत नाही अशा संजय राऊत यांना मात्र पुण्यभूषण नव्हे तर पुण्यदूषण पुरस्कार दिला पाहिजे, अशा शब्दात बन यांनी खरडपट्टी काढली
रोहित पवार यांनी भाजपाला महिला सन्मान जमत नसल्याचा आरोप केला आहे. अहो रोहित पवार, महिला सन्मानाबद्दल तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का? केतकी चितळे यांनी शरद पवारांबद्दल एक पोस्ट लिहिली म्हणून तिला तुरुंगात धाडणारे रोहित पवार तुम्ही होतात. आपल्या काकींबद्दल अपशब्द वापरणारे रोहित पवार तुम्ही होतात. सातत्याने महिलांचा अपमान करणारे रोहित पवार हे महाराष्ट्राला ठाऊक आहेत. त्यामुळे रोहित पवारांनी महिला सन्मानाची भाषा करू नये, असे म्हणत बन यांनी त्यांना फैलावर घेतले.
कुठेही विद्यार्थ्यांवर गोळ्या चालवलेल्या नाहीत, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत स्पष्ट केले असताना संजय राऊत सातत्याने खोटे बोलून दिशाभूल आणि अफवा पसरवत आहेत. दिल्लीच्या आंदोलनात बलात्कारासह इतर गुन्हे आहेत असे काही गुन्हेगार विद्यार्थ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होते. देशामध्ये बांगलादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती झाली पाहिजे, यासाठी ते प्रयत्नशील होते. संजय राऊत, तुम्ही अशा समाजकंटकांचे समर्थन करता, याचे कारण काय, याचे उत्तर देशाला, महाराष्ट्राला हवे आहे. एक लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधणाऱ्यांचा सर्वाधिक प्रतिसाद इंस्टाग्रामवर मिळतोय आणि तरुणाई कायम त्यांच्यासोबत असेल, असे बन यांनी निक्षून सांगितले.





