15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. शतकानुशतके चाललेल्या परकीय सत्तेच्या जोखडातून देश मुक्त झाला. तिरंगा अभिमानाने फडकला, स्वातंत्र्याची पहाट उगवली आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला अर्थ प्राप्त झाला. पण आज, स्वातंत्र्याच्या दशकांनंतर एक प्रश्न मनाला अस्वस्थ करतो, देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का? हा प्रश्न देशाच्या स्वातंत्र्यावर संशय घेणारा नाही, उलट स्वातंत्र्याचा खरा अर्थ शोधणारा आहे. कारण राष्ट्र स्वतंत्र झाले, सत्ता आपल्या हातात आली, राज्यघटना मिळाली, पण समाजातील प्रत्येक माणूस भय, भूक, विषमता, जातीयता, अन्याय आणि शोषणापासून मुक्त झाला का?
स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेला हद्दपार करणे नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार. त्याला विचार करण्याचे स्वातंत्र्य, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य, आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य मिळणे. या कसोटीवर आजच्या भारताकडे पाहिले तर अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. आपल्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला. अस्पृश्यता नष्ट केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, शिक्षणाचा अधिकार आणि सामाजिक न्यायाची दिशा दिली. तरीही जात नावावर माणसाची किंमत ठरते, धर्माच्या नावावर मने दुभंगली जातात, स्त्रीच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहते आणि गरीबाच्या मुलासाठी शिक्षण अजूनही संघर्ष बनते, तर आपण स्वतःला पूर्णपणे स्वतंत्र कसे म्हणायचे?
आजही अनेकांच्या हातात रोजगार नाही. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. कामगाराच्या श्रमाला योग्य मोबदला मिळत नाही. सुशिक्षित तरुण पदवी हातात घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत वर्षे घालवतो. महागाई सामान्य माणसाच्या घरातील बजेट कोलमडून टाकते. अशा वेळी केवळ ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणे पुरेसे आहे का? ज्याच्या घरात चूल पेटत नाही, त्याच्यासाठी स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी असते. ज्याच्या मुलाला शिक्षण मिळत नाही, त्याच्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा असतो. ज्याला जात, धर्म किंवा गरिबीमुळे अपमान सहन करावा लागतो, त्याच्यासाठी स्वातंत्र्य अजून अपुरे असते. स्वातंत्र्याची सर्वात मोठी शत्रू केवळ परकीय सत्ता नसते; कधी-कधी ती आपल्या मनातील गुलामी असते. अंधश्रद्धा, जातीय अहंकार, धार्मिक द्वेष, स्त्रीद्वेष, व्यक्तिपूजा आणि प्रश्न न विचारण्याची मानसिकता हीदेखील गुलामीचीच रूपे आहेत. ब्रिटिश गेले, पण जर आपण विचार करण्याचे स्वातंत्र्य गमावले, तर गुलामीचे स्वरूप बदलले एवढेच म्हणावे लागेल.
लोकशाही ही फक्त पाच वर्षांनी मतदान करण्याची प्रक्रिया नाही. लोकशाही म्हणजे सत्तेला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य. पत्रकाराने प्रश्न विचारला म्हणून त्याच्यावर दबाव येऊ नये. विद्यार्थ्याने आपली भूमिका मांडली म्हणून त्याला देशद्रोही ठरवले जाऊ नये. नागरिकाने प्रशासनाच्या चुकीवर बोट ठेवले म्हणून त्याचा आवाज दाबला जाऊ नये. सत्तेवर प्रश्न विचारणे हा देशद्रोह नसून लोकशाहीचा श्वास आहे. आज सामाजिक माध्यमांच्या युगात माहितीचा स्फोट झाला आहे, पण विवेकाचा विकास त्याच वेगाने झाला आहे का? खोटी माहिती, द्वेषपूर्ण प्रचार आणि अफवा समाजाला विभागत असतील, तर तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरी समाज खरोखर प्रगत झाला असे म्हणता येणार नाही.
आपल्याला स्वातंत्र्यसैनिकांनी फक्त सत्ता हस्तांतरणासाठी लढा दिला नव्हता. त्यांनी अशा भारताचे स्वप्न पाहिले होते, जिथे माणसाला माणूस म्हणून जगता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना ही त्या स्वप्नाचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही केवळ प्रस्तावनेतील सुंदर शब्द नाहीत; ते भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वाचे आधारस्तंभ आहेत. म्हणूनच आज गरज आहे ती स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केवळ तिरंग्याला सलाम करण्याची नाही, तर स्वतःच्या अंतर्मनालाही प्रश्न विचारण्याची. आपण जातीय भिंती तोडल्या का? आपण स्त्रीला खरे स्वातंत्र्य दिले का? आपण गरीबाला सन्मान दिला का? आपण तरुणाला संधी दिली का? आपण शेतकऱ्याला सुरक्षित भविष्य दिले का? आपण विरोधी मताचा आदर करतो का?
या प्रश्नांची उत्तरे जर ‘नाही’ अशी असतील, तर स्वातंत्र्याचा प्रवास अजून पूर्ण झालेला नाही. देश स्वतंत्र झाला आहे, आता माणूस स्वतंत्र करण्याची लढाई बाकी आहे. ही लढाई कोणत्याही एका सरकारची किंवा पक्षाची नाही. ती प्रत्येक नागरिकाची आहे. आपल्या घरातून, आपल्या विचारांतून आणि आपल्या वर्तनातून परिवर्तन सुरू झाले पाहिजे. संविधान वाचणे, समता जगणे, विवेक जागवणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणे, हीच आजची खरी देशभक्ती आहे. 15 ऑगस्टला तिरंगा आकाशात उंच फडकताना पाहताना एक प्रश्न मात्र जमिनीवर उभ्या प्रत्येक भारतीयाने स्वतःला विचारायला हवा. “या तिरंग्याखाली उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाला समान सन्मान, समान संधी आणि निर्भय जीवन मिळत आहे का?” जर उत्तर होकारार्थी असेल, तर स्वातंत्र्य सार्थक आहे आणि जर उत्तर नकारार्थी असेल, तर देशाला मिळालेले स्वातंत्र्य जपण्याबरोबरच माणसाच्या स्वातंत्र्यासाठी अजून एक सामाजिक स्वातंत्र्यलढा उभारण्याची वेळ आली आहे. कारण शेवटी राष्ट्राची खरी मुक्ती सीमांच्या स्वातंत्र्यात नसते, ती प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावरच्या निर्भय हास्यात असते आणि तो दिवस येईपर्यंत प्रश्न जिवंत राहील. देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का?
– प्रविण बागडे





