spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिक्षण ही निरंतर प्रक्रिया – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

– एचएसएनसी विद्यापीठाने संवेदनशील नागरिक घडवावे

मुंबई :- दीक्षांत समारंभ हा शिक्षणाचा शेवट नसून आयुष्यभर शिकण्याच्या प्रवासाची सुरुवात असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एचएसएनसी विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पदवीपूर्व व पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आल्या तसेच ४५ गुणवंत पदवीधर विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले देशाला चांगले डॉक्टर, अभियंते आणि विविध क्षेत्रांतील आहेच तसेच, चांगले नागरिक आणि चांगले नेतृत्व घडविण्याची गरज आहे. “उपेक्षितांच्या जीवनाला स्पर्श करणारी प्रत्येक व्यक्ती ही नेता असते.

एचएसएनसी विद्यापीठाने अल्पावधीत केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करून राज्यपालांनी पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात प्रवेश करताना केवळ पदवीच नव्हे, तर सहानुभूती, करुणा, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची मूल्ये सोबत घेऊन जाण्याचे आवाहन केले.

महाविद्यालयातील शिक्षणाबरोबरच वर्गाबाहेर मिळणारे अनुभवही अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले की, समाजाशी संवाद साधताना विद्यार्थ्यांना संघभावना, करुणा आणि सहानुभूती शिकायला मिळते. हीच मूल्ये पुढे जबाबदार नेतृत्व घडविण्यास उपयुक्त ठरतात.

विद्यापीठे ही “संशोधनाची केंद्रे” असल्याचे नमूद करत राज्यपालांनी एचएसएनसी विद्यापीठाने अल्पावधीत केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. पदवीधर विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच गरीब व वंचितांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

आजचे विद्यार्थी इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पदवीधर होत असल्याचे सांगून राज्यपालांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि हवामान बदल यांसारख्या घटकांमुळे जग झपाट्याने बदलत असल्याचे नमूद केले. करुणा आणि सहानुभूतीविना कृत्रिम बुद्धिमत्तेला अर्थ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तंत्रज्ञानाची खरी ताकद केवळ ते काय करू शकते यात नसून, त्याचा वापर आपण किती विवेकाने करतो यात आहे, असे राज्यपाल म्हणाले. प्रगतीची व्याख्या केवळ तांत्रिक प्रगतीपुरती मर्यादित न ठेवता त्यामध्ये आरोग्य, नैतिकता, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचाही समावेश असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी यावेळी एचएसएनसी विद्यापीठाच्या वतीने मुंबईजवळील अलिबाग येथे जागतिक दर्जाचे विद्यापीठ संकुल विकसित करण्यात येत असल्याची माहिती दिली.

विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांनी सांगितले की, २०२० मध्ये तीन महाविद्यालयांसह सुरू झालेल्या विद्यापीठाने आता आठ विद्यापीठीय शाळा सुरू केल्या असून आणखी पाच महाविद्यालये विद्यापीठाच्या छत्राखाली आली आहेत.

विद्यापीठाचे प्रोव्होस्ट अनिल हरिश यांनी गेल्या सहा वर्षांत विद्यापीठाने केलेली प्रगती अत्यंत प्रभावी असल्याचे सांगितले. विद्यापीठात सध्या सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, अल्पावधीत साधलेली ही उल्लेखनीय कामगिरी आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी एचएसएनसी बोर्डाच्या विश्वस्त माया शहानी, कुलगुरू डॉ. हेमलता बागला, कुलसचिव भगवान बलानी, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयेश जोगळेकर तसेच पदवीधर विद्यार्थी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.