किशोर साहू, मौदा :- खात-रेवराल जिल्हा परिषद क्षेत्र व अदासा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ‘श्री क्षेत्र बल्याची पहाडी, निहारवाणी (झिरी देवस्थान)’ या ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना’ अंतर्गत २ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला आहे.
या निधीतून मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी भव्य सभागृह, किचन, आधुनिक प्रसाधनगृह, बी.टी. रस्ता, वाहनतळ, विद्युतीकरण, जलव्यवस्थापन व लँडस्केपिंगची कामे केली जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण मंजुरीबद्दल भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता, हे विशेष!
दोन कोटी रुपयांच्या विकास निधी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजूर केल्याबद्दल माजी भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल, खात – रेवराल जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या राधा मुकेश अग्रवाल सह मौदा तालुक्यातील व तीर्थक्षेत्र परिसरातील भाविकांनी व नागरीकांनी आभार व्यक्त केले असून, या विकासकामांमुळे भाविकांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होऊन परिसराच्या पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.





