हंसराज,भंडारा :- वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या दरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या वतीने २ सप्टेंबर रोजी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. महिला जिल्हाध्यक्षा राणी ढेंगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असून सरकारने यावर तातडीने नियंत्रण मिळवावे, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
आंदोलनादरम्यान महिलांनी ‘बस हो गई महागाई की मार, नही चाहिये अब ये तानाशाही सरकार’ अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. भंडारा आणि गोंदिया हा विदर्भातील मुख्य भात उत्पादक पट्टा असल्याने, येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून धान पिकाला तातडीने बोनस जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच साखर आणि खाद्यतेलाची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या साठेबाजांवर कडक कारवाई करण्याची गरज आंदोलकांनी व्यक्त केली. आगामी गणेशोत्सव आणि दिवाळीसारखे सण साजरे करताना महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या आंदोलनात राणी ढेंगे यांच्यासह शाहीना खान, नीलिमा रामटेके, शुभदा झंझाड, उर्मिला आगाशे, माळू कारेमोरे, उषा रामटेके, लता बावनकुळे, करुणा राऊत, मीना पौनीकर आणि युवती आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास भविष्यात जनहितार्थ अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी महिला आघाडीने दिला आहे.





