पुणे :- केंद्र शासनाने परदेशातून साखर आयातीचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या १५ दिवसांत साखरेच्या दरात किलोमागे १५ रुपयांनी घट झाली. गणेशोत्सवानिमित्त साखरेच्या मागणीत वाढ झाली असून, किरकोळ बाजारात एक किलो साखरेचे दर ५५ ते ५७ रुपये आहेत.
‘जुलै महिन्यापासून साखरेच्या दरात टप्याटप्याने वाढ झाली. ऑगस्ट महिन्यात साखरेला उच्चांकी दर मिळाले. किरकोळ बाजारात एक किलो साखरेची विक्री ७० ते ७५ रुपये दर मिळाले. साखरेच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना झळ सोसावी लागली. केंद्र शासनाने परदेशातून साखर आयात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर साखरेच्या दरात घट झाली. गेल्या १५ दिवसांत साखरेच्या किलोमागे १५ रुपयांनी घट झाली.
गणेशोत्सवानिमित्त साखरेला मागणी वाढली आहे. सोमवारी घाऊक बाजारात प्रतिक्विंटल साखरेला ५२०० ते ५३०० रुपये दर मिळाले. गेल्या आठवड्यात साखरेचे दर ६० रुपये किलो होते. मागणी वाढल्यानंतर साखरेच्या दरात किलोमागे गेल्या आठवड्याच्या तुलनेत दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली’, अशी माहिती घाऊक बाजारातील साखर व्यापारी विजय गुजराती यांनी दिली.
‘सप्टेंबर महिन्यात पहिल्या १५ दिवसांसाठी केंद्र शासनाने १३ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला. पंधरा दिवसांत ४० टक्के साखर विक्री, त्याबाबतच्या नोंदी करून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. १५ सप्टेंबरला साखरेचा उर्वरित कोटा जाहीर करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात साखर दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने उपाययोजना केल्या आहेत. परदेशातून दहा लाख टनांची साखर आयात करण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परदेशातील साखर प्रक्रिया करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, तसेच दिवाळीत साखरेला मागणी वाढणार आहे,’ असे त्यांनी नमूद केले.





